Lata Mangeshkar: लतादीदींनी गायनाची सुरवात केलेली ‘या’ शहरातून

मुंबई तक

• 09:13 AM • 06 Feb 2022

सोलापूर: देशाच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, आता लतादीदींच्या सोलापुरातील काही आठवणी आता समोर आल्या आहेत. त्यांच्या गायनाची सुरवात सोलापुरातून झाली होती अशी आठवण स्वत: हृदयनाथ मंगेशकर यांनी सांगितली होती. काही दिवसांपूर्वीच पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचे गायन ऐकण्यासाठी आसुसलेल्या सोलापूरकरांनी […]

Mumbaitak
follow google news

सोलापूर: देशाच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, आता लतादीदींच्या सोलापुरातील काही आठवणी आता समोर आल्या आहेत. त्यांच्या गायनाची सुरवात सोलापुरातून झाली होती अशी आठवण स्वत: हृदयनाथ मंगेशकर यांनी सांगितली होती.

हे वाचलं का?

काही दिवसांपूर्वीच पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचे गायन ऐकण्यासाठी आसुसलेल्या सोलापूरकरांनी हुतात्मा स्मृती मंदिरात प्रचंड गर्दी केली होती. पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी बोलता बोलता म्हणाले की, ‘मी दीदीला फोन लावणार आहे आणि ती तुम्हा रसिकांशी संवाद साधणार आहे.’ असे सांगताच सोलापूरकरांनी प्राण कानात एकवटून शांतता पाळली. अन् काही वेळातच कानी पडला भारतरत्न लता मंगेशकर यांचा तो स्वर्गीय स्वर.’सर्व सोलापूरकरांना माझा नमस्कार…’

‘आषाढी एकादशीनिमित्त हृदयनाथ मंगेशकर यांच्या भावसरगम प्रस्तुत”जय हरी विठ्ठल’ या कार्यक्रमाचे आयोजन हुतात्मा स्मृती मंदिरात करण्यात आले होते. यावेळी पंडित मंगेशकर यांनी मुंबईहून सोलापूरला येताना त्यांच्या भगिनी लता मंगेशकर यांच्याशी झालेला संवाद सांगितला.

‘मी सोलापूरला जाणार आहे’, असे म्हटल्यानंतर दीदीने मला सांगितले की, तू सोलापुरात गेल्यानंतर कार्यक्रम सुरू असताना फोन लावून दे. मला सोलापूरकर रसिकांशी बोलायचे आहे. त्यामुळे मी दीदींचा आणि तुम्हा रसिकांचा संवाद घडवून आणणार आहे. असे पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी कार्यक्रमाच्या सुरवातीलाच सांगितले होते.

कार्यक्रमाच्या मध्यतरात त्यांनी स्वरसम्राज्ञी लता मंगेशकरांना फोन लावला होता, ‘हां मी बाळ बोलतोय. इथे रसिक सोलापूरकर जमले आहेत. तुला ऐकायला आतुर झाले आहेत.’ असे पंडितजी म्हणाले. यानंतर दीदी म्हणाल्या…’सर्व सोलापूरकरांना माझा नमस्कार.’ हे भारतरत्न लता मंगेशकर यांचे शब्द भ्रमणध्वनीच्या माध्यमातून कानी पडताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करून लतादीदींना दाद दिली.

पुढे त्या म्हणाल्या, ‘आषाढी एकादशीसारख्या चांगल्या दिवशी तुम्ही हृदयनाथचे गाणे ऐकायला एकत्र आला आहात याचा आनंद आहे. मला सोलापूरला येण्याची इच्छा आहे; परंतु योग येत नाहीये. तुम्हा सर्वांना मी प्रणाम करते. विठ्ठलाचे नाव घेते… जय हरी विठ्ठल…’ हे संभाषण संपल्यानंतर पुन्हा टाळ्यांचा पाऊस सभागृहात पडला.

लतादीदींच्या गायनाची सुरवात सोलापुरातून

1942 मध्ये म्हणजे 73 वर्षांपूर्वी लतादीदींचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर भागवत चित्रमंदिर येथे कार्यक्रमासाठी आले होते. त्यांना गाताना ठसका लागल्याने त्यांनी गाणे थांबविले. तितक्यात मागून एक स्वर आला आणि त्या स्वराने कार्यक्रम पूर्ण केला. तो स्वर होता भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा. त्यांचा स्वर हा जागतिक स्वर म्हणून ओळखला जातो. त्यांच्या गायनाची सुरवात सोलापुरातून झाली होती. अशी आठवण हृदयनाथ मंगेशकर यांनी यावेळी सांगितली होती.

याचबाबतची एक आठवण स्वत: लतादीदींनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन देखील शेअर केली होती. त्यांनी 29 मार्च 2021 रोजी आपला एक अत्यंत जुना फोटो शेअर केला होता. त्यासोबत लतादीदींनी असं लिहलं होतं की,

‘आज आमचे परिचित उपेंद्र चिंचोरे जी यांचा फोन आला होता. त्यांनी मला सांगितलं की, आपण आपला पहिला क्लासिकल परफॉर्मन्स हा वडिलांसोबत 9 सप्टेंबर 1938 साली सोलापूरमध्ये दिला होता. हा फोटो त्या वेळी शो पब्लिसिटीसाठी घेण्यात आला होता. खरंच वाटत नाही की, गाण्याला सुरुवात करुन आज 83 वर्ष पूर्ण झाले.’ असं ट्विट लता मंगेशकर यांनी केलं होतं.

    follow whatsapp