केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर राज्यात भाजपने जन आशीर्वाद यात्रा काढली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागलेल्या मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली जन आशीर्वाद यात्रा आयोजित करण्यात आली असून, या यात्रेची राष्ट्रवादी काँग्रेसकडून पोलखोल केली जाणार आहे. राज्यातील पाच जिल्ह्यात राष्ट्रवादीचे प्रवक्ते पत्रकार परिषदा घेऊन भाजपच्या भूमिकेवर टीका करणार आहे.
ADVERTISEMENT
नारायण राणे, भारती पवार, भागवत कराड आणि कपिल पाटील यांची महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली. मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने जन आशीर्वाद यात्रा काढली आहे. राज्याच्या वेगवेगळ्या विभागात जनआशीर्वाद यात्रा काढण्यात आलेली असून, या यात्रेवरून आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून पोलखोल करण्यात येणार आहे.
‘भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेची पोलखोल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते शनिवारपासून राज्यातील विविध जिल्ह्यांत पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या लोकहिताच्या विपरित राजकारणावर निशाणा साधतील’, अशी माहिती पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली.
पाच जिल्हे पाच पत्रकार परिषदा…
आजपासून (२१ऑगस्ट) पोलखोल पत्रकार परिषद घेण्यास सुरूवात केली आहे. पक्षाचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो हे वसई पत्रकार परिषद घेणार आहेत. तर जयदेव गायकवाड औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार आहेत.
२३ ऑगस्ट रोजी अलिबागमध्ये महेश तपासे पत्रकार परिषद घेणार आहेत. २४ ऑगस्ट रोजी रत्नागिरी येथे संजय तटकरे, तर कणकवलीत अंकुश काकडे पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली.
भाजपच्या पोलखोलला उत्तर?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारने केलेल्या १२७व्या घटना दुरुस्तीबद्दल पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली होती. सरकारने राज्यांना अधिकार दिले, पण ५० टक्के आरक्षणाची मर्यादा कायम ठेवली असून, केंद्र सरकारच्या भूमिकेबद्दल राज्यात सभा घेऊन जनजागृती करू, असं पवार म्हणाले होते.
पवारांच्या भूमिकेवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली होती. ‘पवार सभा घेणार असतील, तर आम्ही त्याच ठिकाणी दुसऱ्या दिवशी पोलखोल करू’, असं पाटील म्हणाले होते. मात्र, भाजपच्या ‘पोलखोल’ला राष्ट्रवादीने आधीच प्रत्युत्तर देण्यास सुरूवात केली असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
ADVERTISEMENT