निष्ठा उद्धव ठाकरेंसाठीच! धुळ्याच्या एसटी कामगाराने रक्ताने लिहिलं निष्ठापत्र

मुंबई तक

• 08:44 AM • 02 Oct 2022

मुंबई : शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मोठी फुट पडली आणि ठाकरे विरुद्ध शिंदे गट अशामध्ये पक्ष विभागला. त्यानंतर शिवसैनिकांनी जमेल तसे शिवसेनेवरील आपली निष्ठा व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी यासाठी विविध फंडे वापरण्यात आले. स्टॅम्पपेपरवर निष्ठापत्र भरुन पाठविली गेली. मात्र धुळ्यातील एका एसटी कामगाराने थेट स्वतःच्या रक्तानेच निष्ठापत्र लिहुन ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठविले […]

Mumbaitak
follow google news

मुंबई : शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मोठी फुट पडली आणि ठाकरे विरुद्ध शिंदे गट अशामध्ये पक्ष विभागला. त्यानंतर शिवसैनिकांनी जमेल तसे शिवसेनेवरील आपली निष्ठा व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी यासाठी विविध फंडे वापरण्यात आले. स्टॅम्पपेपरवर निष्ठापत्र भरुन पाठविली गेली. मात्र धुळ्यातील एका एसटी कामगाराने थेट स्वतःच्या रक्तानेच निष्ठापत्र लिहुन ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.

हे वाचलं का?

धुळे एसटी महामंडळात वाहक असलेले आणि एसटी कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष मनोज गवळी यांनी चक्क स्वत:च्या रक्ताने ठाकरे यांना पत्र पाठवित पक्षावरील निष्ठा व्यक्त केली. त्यानंतर ठाकरे यांनीही तत्परतेने या पत्राची दखल घेतली, आणि जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे यांच्याशी संपर्क साधत मनोज गवळी यांना भेटीसाठी थेट मातोश्रीवर बोलावुन घेतले.

मनोज गवळी मातोश्रीवर गेल्यानंतर आस्थेवाईकपणे चौकशी केली. तसेच पक्षावर दाखविलेल्या निष्ठेबद्दल आभार देखील व्यक्त केले. यावेळी गवळी यांच्या समवेत एसटी कामगार सेनेचे आय.एन.मिर्झा हे देखील उपस्थित होते. मातोश्रीवरुन मिळालेल्या प्रतिसादाबद्दल भारावुन गेलो अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

शपथपत्रांसाठी उद्धव ठाकरेंचे आदेश :

शिवसेनेवरील दाव्याचा खटला सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगात सुरु आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी सदस्यनोंदणी आणि शपथपत्रांची मागणी केली होती. मला वाढदिवसाला पुष्पगुच्छ नकोत. सदस्यनोंदणी आणि शपथपत्रांचे गठ्ठे हवे आहेत, असं म्हणतं त्यांनी शिवसैनिकांकडून वाढदिवसाचं गिफ्ट मागितलं होते.

उद्धव ठाकरेंच्या या आवाहनानंतर शिवसेनेकडून शपथपत्र गोळा करण्यास सुरूवात झाली. सर्व कार्यकर्त्यांनी लवकरात-लवकर शपथपत्र द्यावीत असे आदेश देण्यात आले होते. शिवसेना कोणाची? उद्धव ठाकरेंची का एकनाथ शिंदेंची हा वाद सोडविण्यासाठी कागदपत्र महत्वाची ठरणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सदस्यनोंदणी, शपथपत्र आणि निष्ठापत्र यांना महत्व प्राप्त झाले आहे.

    follow whatsapp