रत्नागिरी : सध्या कोकणात गणेशोत्सव सुरू आहे. मात्र या ऐन गणेशोत्सवात कोकणात राजकीय शिमगा सुरू झाला आहे. शिवसेना नेते, आमदार भास्कर जाधव आणि शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर केलेल्या जहरी टीकेला रामदास कदम यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
ADVERTISEMENT
रामदास कदम म्हणाले की, भास्कर जाधव यांना माझं आव्हान आहे, त्यांनी त्यांचं तोंड लवकर उघडावं. ते कधी तोंड उघडतात याची मी वाट बघतो. मी कृतघ्न आहे, बेईमान आहे असे त्यांनी मला म्हटले. पण जेव्हा मी शिवाजी पार्कवर उद्धवजींसमोर भाषण केले, तेव्हा उद्धवसाहेब शरद पवारांच्या मांडीवर बसले नव्हते. तेव्हा सोनिया गांधींच्या पायाशी ते बसले नव्हते. तेव्हा शिवसेनाप्रमुखांचे हिंदुत्व त्यांच्यासोबत होते. याची माहिती करून घ्या आणि मग बोला, आशा शब्दांत रामदास कदम यांनी भास्कर जाधव यांच्यावर हल्ला चढवला आहे.
अमित शहा मुंबईमध्ये : देवदर्शन, भेटीगाठींसह राजकीय समीकरणांचा भरगच्च कार्यक्रम
कृतघ्न कोण आहे, बेईमान कोण आहे हे मला बोलायला लावू नका, जे वास्तव आहे ते आम्ही बोलतो. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आम्ही वाचवत आहोत आणि भास्कर जाधव तुमच्याकडून मला शिवसेना शिकण्याची आवश्यकता नाही, मी कडवा शिवसैनिक आहे. मी कोणत्याही पक्षात जाऊन आलेलो नाही. आपण कोणावर काय बोलताय हे विचार करून बोला. मला शक्यतो कोकणात शिमगा नको होता, पण सुरुवात तुम्ही केलीत मग शेवट करण्यासाठी रामदास कदम सक्षम आहे असेही आव्हान रामदास कदम यांनी भास्कर जाधव यांना दिले आहे.
उद्धव ठाकरेंनी धोका दिला, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे : अमित शाहंचे मोठे वक्तव्य
भास्कर जाधव काय म्हणाले होते?
शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर टीका करताना म्हणाले होते की, शिवाजी पार्कवर कोणी मेळावा घ्यावा आणि कोणी घेऊ नये हे सांगणारे रामदास कदम कोण? मुळातच या मेळाव्यांमध्ये रामदास कदमांनी ठाकरे यांच्या उपस्थितीत भाषणं केली, ते रामदास कदम एवढे कृतघ्न कसे होऊ शकतात. रामदास कदम यांच्यासारखा खोटारडा माणूस मी कधी पाहिला नाही. त्यांचा भांडाफोड मी करणारच आहे, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली होती.
ADVERTISEMENT