Sanjay Raut: गांधींना मारण्यापेक्षा बॅ. जीनांवर पिस्तुल रिकामे केले असते तर…: संजय राऊत

मुंबई तक

• 07:09 AM • 22 Aug 2021

मुंबई: ‘एखाद्या फाळणीविरोधी गोडसेने पाकिस्तानचा रेटा लावणाऱ्या जीनांवर पिस्तुल रिकामी केली असती तर फाळणीचा स्मृतिदिन साजरा करण्याची वेळ 75 वर्षानंतर आली नसती.’ असं थेट विधान शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी केलं आहे. यापुढे 14 ऑगस्ट हा दिवस फाळणीचा स्मृती दिन पाळावा असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वीच जाहीर केलं. ज्यावरुन संजय […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: ‘एखाद्या फाळणीविरोधी गोडसेने पाकिस्तानचा रेटा लावणाऱ्या जीनांवर पिस्तुल रिकामी केली असती तर फाळणीचा स्मृतिदिन साजरा करण्याची वेळ 75 वर्षानंतर आली नसती.’ असं थेट विधान शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी केलं आहे.

हे वाचलं का?

यापुढे 14 ऑगस्ट हा दिवस फाळणीचा स्मृती दिन पाळावा असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वीच जाहीर केलं. ज्यावरुन संजय राऊत यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या रोखठोक या सदरातून पंतप्रधान मोदींना आणि अप्रत्यक्षपणे RSS ला अनेक टोले लगावले आहेत.

‘फाळणीचा दिवस विसरु नका’, असे पंतप्रधान मोदींचे फर्मान आहे. देशाचे विभाजन म्हणजे अराजकच होते. पाकिस्ताननिर्मितीचे गुन्हेगार हे फक्त महात्मा गांधींना ठरवून नथुराम गोडसेंनी गांधींवर गोळ्या झाडल्या. गांधींना मारण्यापेक्षा बॅ. जीनांवर हा प्रयोग झाला असता तर फाळणीचा स्मृतिदिन साजरा करण्याची वेळ आली नसती.’ असं संजय राऊत यांनी आपल्या अग्रलेखात नमूद केलं आहे.

संजय राऊत यांच्या ‘रोखठोक’ सदरातीला लेखातील महत्त्वाचे मुद्दे:

  • भारताची फाळणी हा एक भयपट होता. फाळणीच्या वेळी दोन्ही देशांच्या सीमेवरील प्रांतांमध्ये झालेल्या अमानुष हिंसेने स्वातंत्र्याचा पहिला दिवस रक्ताने भिजला होता. पंडित नेहरु स्वातंत्र्य दिनाच्या भाषणाची जुळवाजुळव करीत बसले होते. सोबत इंदिरा गांधी होत्या.

  • इतक्यात बाजूच्या खोलीतला फोन वाजला. नेहरु आत गेले. ते फोनवर बोलू लागले, पण समोरून नीट ऐकू येत नव्हते. नेहरू वारंवार समोरच्या व्यक्तीस सांगत होते, ‘पुन्हा सांग! पुन्हा सांग!’ नेहरूंनी फोन ठेवला व काळवंडलेल्या चेहऱ्याने ते खुर्चीवर येऊन बसले. इंदिराजींनी विचारले, ”काय झाले? कुणाचा फोन होता?”

  • ‘लाहोरचा फोन होता.’ नेहरूंना सांगताना हुंदका फुटला. ते म्हणाले, ‘लाहोरच्या हिंदी वसाहतीमधील पाणी पुरविणाऱ्या सर्व लाइन्स दंगलखोरांनी तोडल्या आहेत. सकाळपासून तेथील लहान मुले, आबालवृद्ध पाण्यासाठी वणवण करीत आहेत. हे काय चाललंय? मी रात्री देशवासीयांना भाषणात काय सांगू? त्यांना कसे तोंड दाखवू?

  • फाळणीचे कोणतेही नियोजन नव्हते. कायदा-सुव्यवस्था, माणुसकी रस्त्यारस्त्यावर मुडद्याप्रमाणे पडली होती. या हिंसाचारात 10 लाख लोक मारले गेले. हजारो महिलांनी आपली इज्जत वाचविण्यासाठी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. तर अनेक घरांत आपल्या बायका-मुली-सुनांना स्वतःच मारले, नराधमांच्या हाती लागून त्या महिलांचे जीवन खराब होऊ नये म्हणून.

मोदींची घोषणा! १४ ऑगस्ट Partition Horrors Remembrance Day म्हणून पाळला जाणार

  • सीमावर्ती भागातील रेल्वे स्टेशनांवर फक्त अविश्वासाचेच वातावरण होते. ‘हिंदू पाणी, हिंदू चहा’ आणि ‘मुसलमान पाणी, मुसलमान चहा’ वेगवेगळ्या स्टॉल्सवर विकले जात होते. या सर्व फाळणीच्या आठवणी जागवायच्या की विसरायच्या? पंतप्रधान मोदी यांनी सांगितलेय, ‘फाळणी विसरू नका.’

  • देश अखंड होईल असा आशावाद असलेला मोठा वर्ग आजही जगात आहे. काही लोक गांधी हत्या करणाऱ्या पंडित गोडसेंच्या प्रतिमेची आजही पूजा करतात. त्यांच्या फाशी दिवसाचा सोहळा साजरा करतात. गोडसेंना श्रद्धांजली म्हणून गांधीच्या प्रतिमेवर गोळ्या झाडून पुन्हा-पुन्हा गांधी हत्येचा आनंद साजरा करतात.

  • फाळणी नको असे सांगणारे, लिहणारे मूठभर लोक तेव्हाही अगदी याच पद्धतीने वागत व जगत होते. त्या कालात एखाद्या फाळणीविरोधी गोडसेने पाकिस्तानचा रेटा लावाणाऱ्या जीनांवर पिस्तुल रिकामे केले असते तर फाळणीचा स्मृतिदिन साजरा करण्याची वेळ 75 वर्षानंतर आली नसती. गोडसेने नि:शस्त्र गांधींना मारले.

  • कारण त्यांच्या दृष्टीने फक्त तेच एकमेव फाळणीचे गुन्हेगार होते. मग जीना कोण होते? बॅ. जीनांनी फक्त एक टाइप रायटर, वकिली कौशल्यावर देशाची फाळणी घडवून पाकिस्तान मिळविला. गोडसेसारख्यांनी जीनांना संपवले असते तर देशाचे अखंडत्व नक्कीच टिकले असते.

    follow whatsapp