Indian Army: महाराष्ट्रातील पुराची स्थिती हाताबाहेर, बचाव कार्यासाठी लष्कराला पाचारण

मुंबई तक

• 03:04 PM • 23 Jul 2021

पुणे: अवघ्या महाराष्ट्रात सध्या अभूतपूर्व असा पाऊस कोसळत आहे. त्यामुळे राज्यातील विविध नद्या तुडुंब भरुन वाहत आहेत. अनेक नद्यांनी धोक्याची पातळी पार केल्याने बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पुराची परिस्थिती उद्भवली आहे. सध्या पावसाची एकूण स्थिती लक्षात परिस्थिती अधिकच गंभीर होण्याची शक्यता आहे. सध्या महाराष्ट्रातील रत्नागिरी, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांना पुराचा सर्वाधिक फटका बसला […]

Mumbaitak
follow google news

पुणे: अवघ्या महाराष्ट्रात सध्या अभूतपूर्व असा पाऊस कोसळत आहे. त्यामुळे राज्यातील विविध नद्या तुडुंब भरुन वाहत आहेत. अनेक नद्यांनी धोक्याची पातळी पार केल्याने बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पुराची परिस्थिती उद्भवली आहे. सध्या पावसाची एकूण स्थिती लक्षात परिस्थिती अधिकच गंभीर होण्याची शक्यता आहे. सध्या महाराष्ट्रातील रत्नागिरी, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे नागरी प्रशासनाच्या विनंतीनंतर आता महाराष्ट्रात लष्कराला पाचारण करण्यात आलं आहे.

हे वाचलं का?

पुराची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन भारतीय लष्कर पूरग्रस्त भागातील स्थानिक प्रशासनास मदत करण्यासाठी कंबर कसली आहे. 2019 साली देखील कोल्हापूर आणि सांगली भागात भीषण पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी देखील लष्कराने प्रयत्नांची पराकाष्ठा करुन अनेकांचे प्राण वाचवले होते. आता पुन्हा एकदा तीच जबाबदारी त्यांना पार पाडावी लागणार आहे.

औंध मिलिटरी स्टेशन आणि पुण्यातील बॉम्बे इंजिनिअर ग्रुपचे एकूण 15 मदत आणि बचाव पथकं रत्नागिरी, कोल्हापूर आणि सांगलीच्या पूरग्रस्त भागात पोहचले असून लवकरच बचावकार्य सुरु करण्यात येणार आहे. लष्कराची ही पथकं वेगवेगळ्या भागात सामान्य परिस्थिती होईपर्यंत कार्यरत असणार आहे. यावेळी ते पुराच्या पाण्यात अडकलेल्या स्थानिक लोकांच्या बचाव कार्यात मदत करणार आहेत.

दक्षिण लष्करातील जीओसी-इन-सी लेफ्टनंट जनरल जेएस नैन यांनी याबाबत असं म्हटलं आहे की, ‘भारतीय सैन्य या कठीण काळात लोकांच्या पाठीशी उभं आहे आणि पूरग्रस्त भागातील लोकांना सैन्याकडून सर्वोतोपरी मदत पुरविली जाईल.’

‘लष्कराच्या या टीममध्ये अभियांत्रिकी आणि सैन्य दलाच्या वैद्यकीय पथकाचा समावेश आहे. जे पूरग्रस्त भागातून आलेल्या लोकांना आवश्यक ते प्राथमिक उपचार आणि औषधं यांचा पुरवठा करतील.’

रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सांगली आणि सातारा या पाचही जिल्ह्यात पावसाने अक्षरश: रौद्र रुप धारण केलं आहे. अशावेळी सुरुवातीपासून एनडीआरएफच्या टीम बचाव कार्य करत आहेत. मात्र, एकूण परिस्थिती तासागणिक गंभीर होत चालली आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या विनंतीनंतर केंद्र सरकारने देखील तात्काळ लष्कराच्या 15 टीम रवाना करण्यात आल्या आहेत.

Flood in Maharashtra : मुसळधार पावसाने कोल्हापूरला झोडपलं, पंचगंगेच्या पातळीत वाढ

पश्चिम महाराष्ट्रासह कोकण किनारपट्टीला देखील मुसळधार पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक छोटी-मोठी गावं, शहरं पुराच्या विळख्यात सापडली आहेत. चिपळूण, खेड, महाड या भागाला या पावसाचा सर्वात जास्त फटका बसला आहे.

सध्या या भागात पावसाचा जोर ओसरला असला तरीही अनेक भागांमध्ये पुराचं पाणी अजून कायम आहे. NDRF आणि स्थानिक प्रशासकीय यंत्रणेच्या सहाय्याने या भागात रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. आता इथे लवकरच लष्कर दाखल होणार असल्याने बचावकार्याचा वेग अधिक वाढण्याची शक्यता आहे.

    follow whatsapp