मनीष जोग, जळगाव
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात गेल्या आठवडाभरात सर्वदूर जोरदार पाऊस झाला आहे. मुंबई, कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्राला पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाचा जोर वाढला असून आता जळगावमधील हतनूर धरण पूर्ण क्षमतेने भरले असून या धरणाचे सर्वच्या सर्व म्हणजे तब्बल 41 दरवाजे उघडण्यात आले आहेत.
हतनूर धरण्याच्या पाणलोट क्षेत्रात मागील दोन दिवसांपासून दमदार पाऊस झाल्याने गुरुवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास धरणाचे तब्बल 41 दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे आता तापी नदीपात्रात 1 लाख 30 हजार 665 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे.
धरण क्षेत्रात अद्यापही पाऊस सुरू असल्याने पाणी प्रवाह अजून वाढण्याची शक्यता असल्याने हतनूर धरणाच्या खालील गावांमधील नागरिकांनी तापी नदीपात्रामध्ये कईुणीही आपली गुरे-ढोरे सोडू नये, अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये, असे आवाहन जळगाव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एन. पी. महाजन यांनी केले आहे.
तापी आणि पूर्णा नदीच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत असल्याने खबरदारी म्हणून हतनूर धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. दरम्यान, पुढील काही दिवसात मुसळधार पाऊस बरसणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच ठेवणार असल्याची माहिती मिळते आहे.
गेल्या 21 तासात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तब्बल 14.20 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. यामुळे येथील नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आल्याचं आता दिसत आहे.
दरम्यान, पुढचे 3 ते 4 दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रासाठी धोक्याचे असणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. कोकण आणि गोव्यात 24 तारखेलाही अतिवृष्टीचा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तर 25 ते 27 जुलै दरम्यान मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. याशिवाय मध्य महाराष्ट्रासाठीही हवामान विभागाने अशाच प्रकारचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे पुढील 2 ते 3 दिवस महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाचे असणार आहेत.
पुढील तीन दिवसात रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर या जिल्ह्यांना हवामान विभागाने अतिदक्षतेचा इशारा दिलेला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्याचा परिसर आणि सातारा, पुणे, कोल्हापूर, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, सांगली, सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे.
ADVERTISEMENT