मुंबई: राज्यातील शाळा या 1 डिसेंबरपासूनच सुरु होणार यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. कोरोनाच्या दोन लाटांतून सावरलेल्या महाराष्ट्राची विस्कळीत झालेली घडी पूर्वपदावर येत आहे. अशावेळी, दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनने जगभरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.
ADVERTISEMENT
याच नव्या व्हेरिएंटमुळे महाराष्ट्र सरकार शाळा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर टाकू शकतो अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, सध्या तरी कोरोनाचे नियम पाळून शाळा सुरु करण्यात यावी असा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
पाहा नेमकं काय म्हटलंय राज्य शासनाच्या आदेशात
-
दि. 1 डिसेंबर 2021 पासून ग्रामीण भागातील इयत्ता 1 ली ते 4 थी व महानगर क्षेत्रातील 1 ली ते 7 वीच्या विद्यार्थ्यांचे शाळेतील वरिष्ठ वर्गातील विद्यार्थी व शिक्षकांनी स्वागत करुन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवावा.
-
दि. 1 डिसेंबर 2021 पासून सुरु होत असलेल्या शाळांबाबत शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी यांनी नियमित शाळांना भेटी देऊन आढावा घेऊन आवश्यक तेथे मार्गदर्शन करावे व भेटीचा अहवाल विभागीय शिक्षण उपसंचालक यांना सादर करावा. विभागीय उपसंचालकांनी एकत्रित अहवाल शिक्षण संचालकांना सादर करावा.
राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता 1 ली ते इयत्ता 4 थी व महापालिका हद्दीतील इयत्ता 1 ली ते 7 वीचे वर्ग 1 डिसेंबपासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आलं आहे. तसेच शाळा सुरु करताना नेमकी कोणत्या उपाययोजना कराव्या यासाठी राज्य सरकारने नियमावलीदेखील जारी केली आहे.
राज्य सरकारने अलिकडेच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ग्रामीण भागातील इयत्ता 1 ली ते 4 थी, तर शहरी भागातील 1ली ते 7वीपर्यंतचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, मध्येच कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने डोकं वर काढल्याने. हा व्हेरिएंट धोकादायक असल्याचं सांगितलं जात असल्याने, शाळा पुन्हा सुरू होणार की नाही याबाबत साशंकता होती. मात्र, आता सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे की, राज्यातील शाळा या आता 1 डिसेंबरपासून सुरु होणार यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.
School Reopening : शाळा, पालक, विद्यार्थ्यांना ‘या’ गोष्टी कराव्या लागणार
कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळल्याचं समोर येताच सरकारने नव्याने निर्बंध लागू केले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (28 नोव्हेंबर) वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलावली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला होता.
यावेळी मुख्यमंत्री असे म्हणाले होते की, ‘कोव्हिडच्या धोकादायक नव्या विषाणूला रोखण्यासाठी जे-जे आवश्यक आहे ते सर्व करा. केंद्राच्या सूचनांची वाट न पाहता तातडीने कामाला लागा’, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत.
ADVERTISEMENT