विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा; कोकणासह काही भागात गडगडाटासह पावसाचा अंदाज

मुंबई तक

• 12:54 PM • 19 Mar 2022

राज्यातील हवामान कमालीचे बदल होत असून, आता राज्याच्या एका भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून, किनारपट्टी लगतच्या भागात पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. १९ ते २१ मार्च या कालावधीत विदर्भात उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दक्षिण कोकणसह दक्षिण महाराष्ट्रातील काही भागात गडगडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. […]

Mumbaitak
follow google news

राज्यातील हवामान कमालीचे बदल होत असून, आता राज्याच्या एका भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून, किनारपट्टी लगतच्या भागात पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. १९ ते २१ मार्च या कालावधीत विदर्भात उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दक्षिण कोकणसह दक्षिण महाराष्ट्रातील काही भागात गडगडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हे वाचलं का?

विदर्भ, मराठवाड्यासह राज्यातील तापमानात मार्चपासून वाढ होण्यास सुरूवात झाली असून, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाला गेल्या आठवड्यात उष्णतेच्या तीव्र लाटा सोसाव्या लागल्या. दिवसेंदिवस तापमान कमालीचं वाढू लागलं असून, अनेक भागात पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. अस असतानाच काही भागात ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे.

पुढील तीन दिवसांत राज्यातील हवामान मोठे बदल होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने विदर्भात तापमान वाढीचा, तर कोकणात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

भारतीय हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करून राज्यातील हवामानाबद्दलची माहिती दिली आहे. “भारतीय हवामान विभागाने (IMD) सूचित केल्यानुसार १९ ते २१ मार्च या कालावधीत विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वेगळ्या ठिकाणी उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता आहे”, असं त्यांनी म्हटलं आहे.

त्याचबरोबर दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात आज काही ठिकाणी तुरळक ठिकाणी गडगडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

चक्रीवादळाचीही शक्यता

कोकण किनारपट्टीवर पुन्हा एकदा चक्रीवादळाचं संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात मध्य भागात गुरुवारी कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झाली आहे. पुढील तीन दिवसांत या क्षेत्राची तीव्रता वाढून त्याचे कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होण्याची शक्यता आहे.

कमी दाबाचा पट्टा समुद्रावरून उत्तरेकडे सरकताना त्याचा प्रवास अंदमान निकोबार बेटांच्या जवळून होणार असल्यानं या बेटांना जोरदार वारे आणि पावसाचा फटका बसू शकतो, असा अंदाज आहे. २१ मार्च रोजी यंदाच्या हंगामातील पहिलं चक्रीवादळ तयार होण्याची अंदाज असून, २२ मार्चला हे चक्रीवादळ म्यानमार-बांगलादेशच्या किनारपट्टी जवळ पोचेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तलेला आहे.

    follow whatsapp