बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा मुंडे बहिण-भावामध्ये वाद रंगण्याची शक्यता दिसत आहे. खासदार प्रीतम मुंडे यांनी गेवराई तालुक्यात 14 कोटींच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करत असताना राज्य सरकारसह राष्ट्रवादी काँग्रेसवरही निशाणा साधला. राष्ट्रवादी काँग्रेस सध्या आयत्या बिळावर नागोबा होऊन बसण्याचं काम करत असल्याचं प्रीतम मुंडे म्हणाल्या.
ADVERTISEMENT
रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करत असताना प्रीतम मुंडे यांनी राष्ट्रवादीसह राज्य सरकारवर कडाडून टीका केली. बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुंडे भगिनी आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यात विकासकामांच्या श्रेयवादावरून आरोप प्रत्यारोपाचं राजकारण तापलं आहे. त्यातच प्रीतम मुंडे यांनी पुन्हा एकदा विकास कामाचे श्रेय राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेऊ नये, असे खडे बोल सुनावले आहेत. पंकजा मुंडे पालकमंत्री असताना ही सर्व कामे मंजूर झाली आहेत. त्यामुळे कोणी कितीही नारळ फोडू द्या, जनता हुशार आहे, असा टोला प्रीतम मुंडे यांनी लगावला आहे.
आम्ही मंजूर करून आणलेल्या कामांच्या भूमिपूजनाचे नारळ कोणाला फोडायचे ते फोडू द्या. बीड जिल्ह्यात सध्या घर एक जण बांधतोय आणि त्या घराची वास्तुशांती दुसराच कोणीतरी करतोय. त्यामुळे आम्ही बांधलेल्या घराची वास्तुशांती राष्ट्रवादीच्या लोकांनी करू नये, सध्या राष्ट्रवादी आयत्या बिळात नागोबा होऊन बसण्याचं काम करत असल्याचं प्रीतम मुंडे म्हणाल्या.
प्रीतम मुंडेंनी यावेळी बोलत असताना जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांचाही समाचार घेतला. या कार्यक्रमात शासकीय अधिकारी मंचावर न बसता सभामंडपाच्या बाजूला बसले होते. त्यामुळे प्रीतम मुंडे यांनी अधिकार्यांवर स्थानिक प्रशासनाचा दबाव आहे का असा प्रश्न? उपस्थित केला.
प्रीतम मुंडे म्हणाल्या, “बीड जिल्ह्यातील सर्व कंत्राटदारांची नार्को टेस्ट करा आणि त्यांना विचारा की, गेल्या आठ वर्षात प्रीतम मुंडे यांनी कुठल्या कंत्राटदारकडून कामाच्या बदल्यात काही पैसे घेतले आहेत का? मी कुणाचा चहादेखील घेतला नाही. मी प्रामाणिकपणाने तुमचं काम करण्याचा प्रयत्न करत असून तुमचे प्रश्न सरकार दरबारी मांडत आहे.”
ADVERTISEMENT