बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर हिचं पुस्तक वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. ‘करीना कपूर खान्स प्रेग्नन्सी बायबल’ या नावाचं पुस्तक करीनाने लिहिलं आहे. करीना कपूर आणि तिची सहकारी आदिती शहा या दोघींनी हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकाच्या नावावरून आता ख्रिश्चन धर्मियांच्या भावना दुखावल्याचा आरोप अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाने केला आहे. अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाने करीना कपूरविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
काय म्हटलं आहे ख्रिश्चन महासंघाने काय म्हटलं आहे?
बायबल हा ख्रिश्चन धर्मियांचा पवित्र धर्मग्रंथ आहे. तरीही करीना कपूरने लिहिलेल्या पुस्तकाच्या शीर्षकात बायबल या शब्दाचा वापर केला आहे. हा बायबल शब्द हटवण्यात यावा अशी मागणी अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाने केली आहे. तसंच धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी कलम 295- A अंतर्गत करीना कपूर आणि इतरांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीही महासंघाने केली आहे. करीना कपूर आणि आदिती शहा तसेच प्रकाशकांनी तातडीने ख्रिश्चन समाजाची माफी मागावी अशीही मागणी अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाने केली आहे.
अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे अध्यक्ष आशिष शिंदे यांनी ही तक्रार दाखळ केली आहे. बीड येथील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Pregnancy Bible हे पुस्तक करीना कपूर आणि आदिती शाह यांनी लिहिलं आहे तसंच हे पुस्तक Juggernaut Books यांनी प्रकाशित केलं आहे. पुस्तकाच्या शीर्षकात बायबल शब्द वापरल्याने आमच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत असं अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाने म्हटलं आहे. दरम्यान करीनाने लिहिलेलं हे पुस्तक सध्या अॅमेझॉनवरचं बेस्टसेलर पुस्तक आहे.
शिवाजी नगर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी या प्रकरणी तक्रार आल्याचं म्हटलं आहे. मात्र अद्याप या प्रकरणी FIR दाखल करण्यात आलेली नाही. शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांनी ही माहिती PTI ला दिली. ही घटना बीडमध्ये घडलेली नाही, तर मुंबईत घडली आहे त्यामुळे तुम्ही मुंबईत तक्रार दाखल करा असा सल्लाही मी तक्रारदारांना दिल्याचं ठोंबरे यांनी स्पष्ट केलं आहे. करीना कपूरचं हे पुस्तक 9 जुलै रोजी प्रकाशित झालं. तिच्या दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर तिने हे पुस्तक लिहिलं आहे. मात्र ते आता त्याच्या शीर्षकावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. आता या प्रकरणी आणखी काय काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT