सातारा: गेल्या दोन तीन दिवसांपासून जिल्ह्यात अतिवृष्टी होत आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील नदीकाठच्या लोकांचे पूराचा संभाव्य धोका ओळखून एकूण 189 कुटुंबातील 755 जणांना त्यांच्या गावातील जवळच्या नातेवाईकांकडे तसेच नगरपालिका शाळा या ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आलेले आहे.
ADVERTISEMENT
कराड तालुक्यातील तांबवे गावातील 50 कुटुंबातील 207 व्यक्तींना गावातील जवळच्या लोकांकडे व नातेवाईक यांच्याकडे, कराड येथील 42 कुटुंबातील 163 व्यक्तींना नगरपालिका शाळा क्र. 2,3,4,11 येथे, नांदगाव येथील 12 कुटुंबातील 49 व्यक्तींना गावातील जवळच्या लोकांकडे व नातेवाईक यांच्याकडे, काले येथील 15 कुटुंबातील 58 व्यक्तींना गावातील जवळच्या लोकांकडे व नातेवाईक यांच्याकडे स्थलांतरित करण्यात आलं आहे.
टाळगाव येथील 30 कुटुंबातील 118 व्यक्तींना गावातील जवळच्या लोकांकडे व नातेवाईक यांच्याकडे, पोतले येथील 12 कुटुंबातील 52 व्यक्तींना आनंदराव चव्हाण विद्यालय पोतले व जानुबाई मंदिर पोतले येथे, येणके येथील 3 कुटुंबातील 13 व्यक्तींना जवळच्या नातेवाईकांकडे, आणे येथील 8 कुटुंबातील 30 व्यक्तींना जवळच्या नातेवाईकांकडे स्थलांतरित करण्यात आले आहे.
वाई तालुक्यातील जांभळी येथील 3 कुटुंबातील 14 व्यक्तींना जवळच्या नातेवाईकांकडे स्थलांतरित करण्यात आले आहे. महाबळेश्वर तालुक्यातील दरे, धावली, भेकवली, येरणे येथील 9 कुटुंबातील 30 व्यक्तींना जवळच्या नातेवाईकांकडे,पाटण तालुक्यातील पाटण शहरातील 5 कुटुंबातील 21 व्यक्तींना स्थलांतरित करण्यात आले आहे.
मदतकार्य सुरु
मदत कार्यातून मिरगाव येथील 150 व्यक्ती, आंबेघर येथील 50 व्यक्ती, ढोकवळे येथील 50 व्यक्ती, सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहेत. वाझे येथील 50 व्यक्तींना बोटींनी हलविण्याचे काम सुरु असून एक टीम एनडीआरएफच्या मदतीसाठी मिरगाव येथे पोहचली आहे. 2 टीम भुवनेश्वरवरून मागविल्या असून त्या आता पुण्यातून कराडकडे रवाना झाल्या आहेत. नांदगाव ता. कराड 50, पाली 15 सुरक्षित ठिकाणी हलविले असल्याची माहिती जिल्ह्याधिकारी शेखर सिंह यांनी दिली.
Satara Rain: निसर्ग कोपला… साताऱ्यात अतिवृष्टीमुळे आतापर्यंत तब्बल 14 जणांचा मृत्यू
सातारा जिल्ह्यात सध्या चालू असलेल्या अतिवृष्टीमुळे पाटण तालुक्यातील मिरगाव, आंबेघर, हुंबरळी, ढोकावळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्त हानी झालेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाल्याचं समजतं आहे.
तथापि, दरड कोसळल्यामुळे अद्यापही ढिगाऱ्याखाली काही जण अडकले असण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे अद्याप तरी मृतांचा निश्चित आकडा सांगता येणार नाही.
या ठिकाणी एनडीआरएफचे एक पथक आणि स्थानिक प्रशासन, नागरिकांच्यामार्फत युध्दपातळीवर शोध व बचावकार्य सुरु आहे.
जावळी तालुक्यातील रेंगडी गावामध्ये दोन व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने बेपत्ता आहेत तर दोन व्यक्ती मयत असल्याचं समजतं आहे.
ADVERTISEMENT