ठाकरे सरकारने मला रूग्णालयातच ठार करण्याचा कट आखला होता असा धक्कादायक आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत केला आहे. विधानसभेत त्यांनी ठाकरे सरकारवर विविध आरोप केले आहेत. मात्र हा अत्यंत धक्कादायक आरोप नितेश राणे यांनी केला आहे.
ADVERTISEMENT
भाजप आमदार नितेश राणे आता कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात दाखल, नेमकं काय झालं?
नेमकं काय म्हणाले नितेश राणे?
‘फार जबाबदारीने एक माहिती मला सभागृहात आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना द्यायची आहे. मला कोल्हापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलं होतं. त्यावेळी डॉक्टर येऊन माझ्याकडे आग्रह करू लागले की नितेशजी तुमचं सिटी अँजिओ करण्याची गरज आहे. मी त्यांना म्हणालो की मला तर असं काही वाटत नाही. माझं बीपी लो झालं होतं ते मला कळलं होतं. पण सिटी अँजिओ करायला सांगितलं आहे असं सांगितलं. त्यातले काही लोक आमच्या बाजूनेही होते. त्यातल्या काही लोकांनीच येऊन मला सांगितलं की साहेब हे सिटी अँजिओ करू नका. त्यानिमित्ताने इंक शरीरात तुम्हाला द्यावी लागेल. ती इंक टाकून तुम्हाला मारून टाकण्याचा प्लान आहे. मारून टाकण्याचा प्लान असल्याचं मला तिथल्या कर्मचाऱ्याने सांगितलं.
हा प्रकार माझ्यासोबत कोल्हापूरच्या हॉस्पिटलमध्ये झाला आहे. माझा मेडिकल रिपोर्ट मी पाहिला त्यात माझं ब्लड प्रेशर लो दाखवत होतं. माझी शुगर लेव्हल लो दाखवत होते. तरीही रात्री अडीच वाजता पोलीस मला डिस्चार्ज करून अटक करायला पाठवण्यात आले. पोलिसांनी आल्यानंतर जेव्हा मला पाहिलं तेव्हा त्यांना समजलं की माझी अवस्था वाईट आहे. त्यामुळे पोलीस बाहेर गेले. ईसीजी मशीनमध्ये मी काय बोट टाकलं नव्हतं. तरीही मुंबईहून, कलानगरमधून फोन येत होते. एका केसच्या निमित्ताने हे सगळं सुरू होतं. विरोधी पक्षाच्या लोकांना सभागृहात येण्यासाठी जिवंतच ठेवायचं नाही असं षडयंत्र रचलं गेलं होतं. शरीरात औषधं टाकून कायमस्वरूपी विषय संपवायचा याला म्हणतात ठाकरे सरकार. या बाबतीत गंभीरपणे लक्ष देण्याची गरज आहे.’ असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
आणखी काय म्हणाले नितेश राणे?
माझ्याकडे पेन डाईव्ह आहे तो मी न्यायालयात देणार असंही आमदार नितेश राणे म्हणाले. ते म्हणाले की, माझ्याकडे पुरावा आहे, आम्ही सिद्ध करू शकतो. 8 तारखेच्या रात्री राज्यातला एक मंत्री त्या पार्टीत होता. त्याचे पुरावे आहेत ते आम्ही कोर्टात देऊ. पोलिसांनी आता कामावर लक्ष द्यावे, जनतेवर लक्ष द्यावे. नितेश राणे काय करतात, कोणते कपडे घालतात याकडे लक्ष देऊ नये असाही टोला त्यांनी लगावला.
ADVERTISEMENT