शिर्डी: शिर्डीच्या साईभक्तांसाठी एक चांगली बातमी आहे. कोव्हिड-19 महामारीमुळे 5 एप्रिल 2021 पासून बंद असलेले साईबाबा प्रसादालय सुरु करण्यास व प्रसाद लाडू वाटपास अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी साईबाबा संस्थानला बुधवारी (25 नोव्हेंबर) लेखी पत्राद्वारे परवानगी दिली आहे.
ADVERTISEMENT
महाराष्ट्र सरकारच्या अनुमतीने 7 ऑक्टोबरपासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे खुली करण्यात आली आहेत. शिर्डीचं साईबाबा मंदिरसुद्धा 7 ऑक्टोबर पासून दर्शनासाठी खुले करण्यात आले. मात्र, जिल्हा प्रशासनाने साईबाबा प्रसादालय बंद ठेवण्यास सांगितलं होतं. दरम्यान, प्रसादालय बंद असल्याने हजारो भाविकांची कुचंबणा होत होती.
साईबाबा मंदिर प्रशासनाने वेळोवेळी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रसादालय सुरू करण्याबाबत लेखी मागणी केली होती. अखेर आता त्याला परवानगी मिळाली आहे.
23 नोव्हेंबर रोजी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत साईबाबा संस्थान मार्फत लाडू प्रसाद वाटप व प्रसादालय कोविड-19 च्या नियमावलीचे पालन करत सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात लाडू प्रसाद वाटप साई मंदिर परिसराबाहेर करण्यात यावे, मंदिर परिसरात भाविक सेवन करणार नाही याची दक्षता घ्यावी. अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत.
प्रसाद वाटपासाठी या सूचनांचे करावे लागणार पालन
-
साईबाबा प्रसादालय 50% आसन क्षमतेने सुरु करावे.
-
साईबाबा प्रसादालय व लाडू प्रसाद वाटप यंत्रणेतील कर्मचारी अधिकाऱ्यांनी covid-19 प्रतिबंधात्मक दोन लसीचे डोस घेणे अनिवार्य आहे.
-
covid-19 बाबतच्या शासनाच्या तसेच जिल्हा आपत्ती प्राधिकरण अहमदनगर यांच्याकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशांचे /निर्बंधांचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र साईबाबा संस्थानने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याबाबत पत्रात नमूद करण्यात आले आहे.
शिर्डी संस्थान समिती प्रकरणी ठाकरे सरकारला धक्का! संस्थानचा कारभार जिल्हा न्यायाधीशांकडेच राहणार
दरम्यान, या निर्णयामुळे आता लाखो भाविकांना दिलासा मिळाला असून त्यांना आता पुन्हा एकदा साईबाबांच्या प्रसादाची चव चाखता येणार आहे. तसंच यामुळे अनेकांना रोजगार देखील मिळणार आहे. त्यामुले जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाचं स्थानिकांसह साई भक्तांनी देखील स्वागत केलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT