राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पक्षाने आयोजित केलेल्या एका शिबिरात बोलताना असं विधान केलं की, “राम नवमी आणि हनुमान जयंती राज्यात दंगली घडवण्यासाठीच आहे की काय, असं वाटू लागलं आहे.” आव्हाडांच्या या विधानानंतर भाजप नेते आक्रमक झाल्याचं दिसून आलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही जितेंद्र आव्हाडांवर टीका केली. त्यानंतर ANI वृत्तसंस्थेशी बोलताना आव्हाडांनी सविस्तर भूमिका मांडली.
ADVERTISEMENT
आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, “राम म्हणजे करुणा पुरूष करुणा मूर्ती. ज्याच्या प्रत्येक क्रियेत करुणा आहे. ज्यांच्या डोळ्यात सुद्धा करूणा दिसते. आम्ही लहानपणी राम बघायचो. नीळवर्णीय. एका बाजूला सीता, तर दुसऱ्या बाजूला लक्ष्मण उभे. खांद्यावर धनुष्यबाण लटकावलेला आहे. आजचा राम एकटाच. तोही क्रोधित झालेला. तुम्ही या रामाची मूर्ती का बददली?”
राम कसा होता हे मुलांना समजवावं लागेल -जितेंद्र आव्हाड
“बदलत चाललेला राम आहे. हे आपल्या मुलांना समजवावं लागेल की, हा राम तो राम नाहीये. तो राम आईवडिलांचं ऐकणारा राम होता. आपल्या पत्नीवर प्रेम करणारा. एक पत्नीत्वाचं वचन देणारा राम होता. ते मुलांना समजवावं लागेल. त्याने कसा जातीयवाद संपवला, तो कसं भावावर प्रेम करायचा?”, असं जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले.
हेही वाचा >> जितेंद्र आव्हाडांनी ट्विट केला चेंगराचेंगरीचा व्हिडीओ, म्हणाले…
याच मुद्द्यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले, “अधर्माचा पराभव करण्यासाठी त्याने काय काय केलं हे सांगावं लागेल. हे जर सांगणार नाही, तर मला असं वाटतं की, माझी जगण्याची लायकी नाही. माझ्या बोलण्यामुळे कुणाला त्रास झाला असेल, तर मला नाही माहिती. पण माझं कोणतंही विधान तर्काला सोडून नाही. मला जसा राम समजला तसाच राम तुम्ही समाजाला सांगणार नसाल, तर तुम्ही समजात द्वेष निर्माण करत आहात. दरी निर्माण करत आहात”, अशी भूमिका मांडत जितेंद्र आव्हाड यांनी अप्रत्यक्षपणे भाजपला लक्ष्य केलं.
राम जसा आहे तसा सांगा, जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?
आव्हाड असंही म्हणाले की, “राम जसा आहे, तसा सांगा. दहा वर्षात का नाही झालं हे सगळं. 50 वर्षात हे का नाही घडलं, यावर्षीच का घडलं? येणाऱ्या काळात असं घडणार नाही, यासाठी आजपासूनच असं करा ना. प्रेमाचं प्रतिक, करुणेची मूर्ती, आईवडिलांचं ऐकणारा, शबरीला आपलं मानणारा, जो वानर सेना बनवतो, तो राम.”
हेही वाचा >> ‘मतांच्या राजकारणासाठी एका संताचा…’, जितेंद्र आव्हाड शिंदे-फडणवीसांवर बरसले
“राम नवमी आणि हनुमान जयंतीला दंगे होतात असं मी म्हणालेलो नाही. मी असं म्हणालो की, तसं वातावरण तयार केलं जातं. बिहारमध्ये काय झालं याची माहिती घ्या, पश्चिम बंगालमध्ये काय झालं माहिती घ्या. महाराष्ट्रात काय झालं. याच तीन राज्यात का झालं?”, असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी उपस्थित केला.
ADVERTISEMENT