Sanjay Raut vs Narendra Modi : विरोधकांनी त्यांच्या आघाडीला इंडिया असं नाव दिलं. याच नावावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर टीका केली. मोदी यांची तुलना थेट इंडियन मुजाहिद्दीन आणि ईस्ट इंडिया कंपनीशी केली. त्यावरूनच खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सुनावलं.
ADVERTISEMENT
खासदार संजय राऊत यांनी रोखठोक लेखातून मोदींना प्रत्युत्तर दिलंय. राऊत म्हणतात, “मोदी यांनी ‘इंडिया’ आघाडीस ईस्ट इंडिया कंपनीची उपमा दिली. ईस्ट इंडिया ही ब्रिटिशांची व्यापारी कंपनी होती आणि ते व्यापारी म्हणून आले व राज्यकर्ते बनले. ईस्ट इंडिया कंपनीप्रमाणे गुजरातचे दिल्लीतील राज्यकर्तेही व्यापारीच आहेत. आपण व्यापारीच आहोत हे पंतप्रधान मोदी यांनी स्वत: मान्य केले आहे.”
संघाचा उल्लेख, स्वातंत्र्यातील योगदानावरून डिवचलं
संजय राऊत पुढे म्हणतात, “ईस्ट इंडिया कंपनीशी लढण्यात आजचा संघ परिवार कोठेच नव्हता. स्वातंत्र्यासाठी रक्ताचा थेंब न सांडता स्वातंत्र्याची सर्व फळे आज ही मंडळी चाखत आहे. फाळणीच्या वेळी प. बंगाल, नौखालीत हिंसाचाराचा वणवा पेटला असताना महात्मा गांधी निर्भयपणे त्या वणव्यात शिरले होते. आज मणिपूर जळत असताना पंतप्रधान मोदी तेथे जात नाहीत की बोलायला तयार नाहीत. भाजपने ईस्ट इंडिया कंपनीचे धोरण कोठे अनुभवले? आजच्या ‘इंडिया’ बनवण्याच्या योजनेत ते तर कोठेच नव्हते”, असा हल्ला राऊतांनी चढवला.
वाचा >> मुंबई Tak Chavadi: ‘पंकजाताईंना कोणीही संपवत नाहीए’, धनंजय मुंडेंनी फडणवीसांना घातलं पाठिशी?
“भारत छोडो’, ‘चले जाव’ आंदोलनाच्या बाबतीत पं. श्यामा प्रसाद मुखर्जी यांची भूमिका वेगळी होती. या आंदोलनास त्यांचा पाठिंबा नव्हता व त्यांनी तसे पत्र ब्रिटिशांना म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीस लिहिले होते असे जाणकार सांगतात. त्यामुळे आपल्या विरोधकांवर ईस्ट इंडिया कंपनी असल्याचा आरोप करणे म्हणजे स्वत:वरच आरोप करण्यासारखे आहे. ‘इंडिया’ म्हणजे अतिरेकी, असे मोदी म्हणतात, पण त्यांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील किमान पाच पक्षांत ‘इंडिया’ आहे. आाल इंडिया अण्णा द्रमुक, रिपब्लिकन पार्टी आाफ इंडिया (आठवले). मग हे ‘इंडिया’वाले आता काय करणार”, असा मुद्दा उपस्थित करत राऊतांनी मोदींना घेरलं.
मोदी सरकारची तुलना ईस्ट इंडिया कंपनीशी
संजय राऊत यांनी भाष्य करताना मोदी सरकारची तुलना ईस्ट इंडिया कंपनीशी केलीये. ते म्हणतात, “ईस्ट इंडिया कंपनी हे व्यापारी वृत्तीचे राज्यकर्ते होते व त्याचेच प्रतिबिंब देशाच्या आजच्या राज्य कारभारावर पडलेले दिसते. आजचे राज्यकर्ते सत्तेचा वापर व गैरवापर पुरेपूर करीत आहेत. ईस्ट इंडिया कंपनीचे व्यापारी नोकरशहा इंडियात येऊन सर्व भोग घेत व मुखवटा मानवता, समाजसेवेचा व सुधारणांचा लावत. ईस्ट इंडिया कंपनीच्या नोकरांचे पगार फार नव्हते. त्यामुळे ते व्यापारी, जमीनदार व इतर धनिकांना हाताशी धरून आपल्या गरजा भागवत. आपण सत्तेचे मालक आहोत त्यामुळे कसेही वागण्याचा आपल्याला परवाना आहे असेच ते मानत.”
वाचा >> Loksabha सर्व्हे: महाराष्ट्राने शिंदे-अजित पवारांना नाकारलं, NDA ला मिळणार फक्त…
“हेन्री व्हान्सिटार्ट हा ईस्ट इंडिया कंपनीत 1761 मध्ये बंगालचा गव्हर्नर होता. लाच, नजराणे वगैरे घेण्याबद्दल त्याला कसलाच कमीपणा वाटत नव्हता. तो गुलहौशी होता. इंग्लंडमधील एका मित्राला लिहिलेल्या पत्रात तो म्हणतो, “मित्रा, आम्ही सत्तेवरील लोक आहोत व आम्ही फायदा घेतो असे तू म्हणतोस. पण मित्रा, असा फायदा घ्यायचा नाही तर अधिकारावर राहावयाचे कशासाठी?” सध्याच्या भाजपची मानसिकता याच ईस्ट इंडिया कंपनीप्रमाणे आहे. अर्थात त्या ईस्ट इंडिया कंपनीत माल्कमसारखे लोक होते तसेच व्हान्सिटार्टसारखे सत्ताभोगी आणि लुटारूदेखील होते. स्वतंत्र हिंदुस्थानातही माल्कम आहेत तसे व्हान्सिटार्टदेखील आहेत. यापैकी आपण कोणाचे वारसदार हे भाजपने ठरवायचे आहे. विरोधकांना ईस्ट इंडिया कंपनी म्हणत असाल तर स्वत:चे चरित्रही तपासायची हिंमत ठेवा”, असा इशारा राऊतांनी या लेखातून मोदींना दिलाय.
ADVERTISEMENT