Ashok Chavan: अजितदादांचं बंड, चव्हाणांचा राजीनामा; मोदींचा मास्टरस्ट्रोक!

मुंबई तक

13 Feb 2024 (अपडेटेड: 13 Feb 2024, 09:34 PM)

Ashok Chavan BJP and PM Modi Masterstrok: अशोक चव्हाणांवर आरोप झालेल्या आदर्श घोटाळ्याचा पंतप्रधान मोदींनी उल्लेख केल्याच्या काही दिवसातच अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. जाणून घ्या मोदींचा नेमका मास्टरस्ट्रोक काय आहे.

follow google news

Ashok Chavan Join BJP: निलेश झालटे, मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसमधील मातब्बर नेते अशोक चव्हाणांनी काँग्रेसला राम राम ठोकलाय. पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा तर दिलाच शिवाय त्यांनी आमदारकीचा देखील राजीनामा दिलाय, जो  विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्वीकारला देखील आहे. काँग्रेस सोडल्यानंतर आता ते भाजपमध्ये जाणार हे त्यांनी क्लिअर केलं आहे. तसंच आता त्यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते, असाही अंदाज आहे. (ajit pawar rebellion ashok chavan resignation pm modi masterstroke)
 
अशोक चव्हाण यांच्यासारखा मातब्बर नेता सोडून जाणं काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. गेल्याच आठवड्यात काँग्रेसच्या बाबा सिद्दीकी यांनी अजित पवार गटात प्रवेश केला होता. तर मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता अशोक चव्हाण यांच्या जाण्यानं  काँग्रेस पक्षाला खिंडार पडल्याचं बोललं जात आहे. 

हे वाचलं का?

भ्रष्टाचाराचे आरोप अन्...

दरम्यान, चव्हाण यांनी काँग्रेस सोडल्यानंतर अजित पवार आणि चव्हाण यांच्यातील एक साम्य समोर आलं आहे. अशोक चव्हाण यांनी राजीनामा देऊन भाजपच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे आणि याचं मुख्य कारण मोदी सरकारनं लोकसभा अधिवेशनादरम्यान काढलेली एक श्वेतपत्रिका असल्याचं बोललं जात आहे. निर्मला सीतारामण यांनी यूपीए सरकारच्या काळातील भ्रष्टाचारासंदर्भात एक श्वेतपत्रिका लोकसभेत ठेवली होती. यात चव्हाण यांच्या आदर्श प्रकरण तसेच इतर अनियमित कारभाराचा पर्दाफाश करण्यात आला होता. हा अशोक चव्हाण यांना एक इशारा होता, अशी चर्चा आहे.  

अशोक चव्हाण यांच्याबाबत जसं झालं होतं तसंच सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबतसुद्धा घडलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन महिन्यांपूर्वी भोपाळ येथे भाजपच्या मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप केले होते. शिवाय 70,000 कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याचा आरोपही मोदींनी केला होता. शिवाय महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्याचा देखील उल्लेख त्यांनी केला होता. 

या आरोपांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी पक्षातील अनेक आमदारांसह महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतलेला. राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांचा मोठा गट बरोबर घेत अजित पवार यांनी भाजपा-शिवसेनेशी (शिंदे गट) हातमिळवणी केली आणि ते सत्तेत सहभागी झाले. यानंतर शरद पवारांनी मोदींना या दोन्ही घोटाळ्यांची चौकशी करावी अशी मागणी देखील केली होती. 

15 फेब्रुवारी रोजी अमित शाह हे महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असून, त्यावेळीच अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश होणार असल्याचं बोललं जात आहे. शाहांच्या दौऱ्यादरम्यान अनेक मोठे पक्ष प्रवेश होणार असून, त्याचवेळी चव्हाण हे देखील भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक प्रतिक्रिया दिलीय. 

'अनेक चांगले नेते भाजपच्या संपर्कात आहेत. ज्याप्रकारे काँग्रेस पक्ष गेले काही वर्षे वाटचाल करत आहे, त्यातून जनतेशी जोडले गेलेल्या नेत्यांची घुसमट होत आहे. त्यातून देशभरातून काँग्रेसमधील लोकनेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे निश्चितच काही मोठे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे आता एवढंच म्हणेन आगे आगे देखीये होता है क्या…", अशी सूचक प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती.

आदर्श घोटाळा लपवण्यासाठी अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले की काय असे म्हणत उद्धव ठाकरेंनी चव्हाण यांच्यावर निशाणा साधला. ठाकरेंसोबत अनेक विरोधी पक्षातील नेते चव्हाणांवर टीका करत आहेत. लोकसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आलेली असताना काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते एकामागून एक असे पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याने काँग्रेससाठी डॅमेज कंट्रोल करणं अवघड असणार आहे.  

चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर आणि भाजप प्रवेशाच्या चर्चेनंतर अजितदादांच्या युतीसोबत जाण्याच्या निर्णयाचा फ्लॅशबॅक चर्चेत आला आहे. भाजप नेत्यांच्या दाव्यानुसार आता अजून कोण-कोण भाजपसोबत जातंय हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 

    follow whatsapp