IPL 2021 भारतात आयोजित करणं ही चूक नव्हती – BCCI अध्यक्ष सौरव गांगुली

मुंबई तक

• 12:26 PM • 06 May 2021

खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यानंतर बीसीसीआयने आयपीएलचा चौदावा हंगाम मध्यावधीत स्थगित केला आहे. कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपरकिंग्ज, दिल्ली कॅपिटल्स, सनराईजर्स हैदराबाद या संघातील खेळाडू-सदस्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर बीसीसीआयने हा निर्णय घेतला. या सर्व घटनाक्रमानंतर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याने पहिल्यांदा आपली प्रतिक्रीया दिली आहे. इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत गांगुलीने आयपीएलचं आयोजन भारतात करणं ही चूक […]

Mumbaitak
follow google news

खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यानंतर बीसीसीआयने आयपीएलचा चौदावा हंगाम मध्यावधीत स्थगित केला आहे. कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपरकिंग्ज, दिल्ली कॅपिटल्स, सनराईजर्स हैदराबाद या संघातील खेळाडू-सदस्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर बीसीसीआयने हा निर्णय घेतला. या सर्व घटनाक्रमानंतर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याने पहिल्यांदा आपली प्रतिक्रीया दिली आहे. इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत गांगुलीने आयपीएलचं आयोजन भारतात करणं ही चूक नव्हती असं स्पष्ट केलंय.

हे वाचलं का?

“भारतात आयपीएलचं आयोजन करणं ही चूक नव्हती. ज्यावेळी आम्ही स्पर्धा आयोजित करायचं ठरवलं त्यावेळी रुग्णसंख्या ही अगदीच कमी होती. आम्ही इंग्लंड दौराही अत्यंत चांगल्या पद्धतीने आयोजित केला. बायो सिक्युअर बबल मोडलं गेल्याच्या बातम्या समोर येत आहेत, पण असं काही झालं असेल असं मला वाटत नाही. जी माहिती मला मिळाली आहे त्यानुसार बायो बबल मोडलं गेलं नव्हतं. परंतू हे सर्व कसं झालं हे सांगणं खरंच कठीण आहे. देशातही लोकांना इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण कशी होतेय हे सांगणं कठीण आहे.” सौरव गांगुलीने स्पर्धा भारतात आयोजित करण्याचं समर्थन केलं.

हंगाम स्थगित झाल्यानंतर बीसीसीआय वर्षाअखेरीस युएईमध्ये आयपीएलचा उर्वरित हंगाम खेळवले अशा चर्चांना उधाण आलं होतं. परंतू यासाठी परिस्थितीचा अंदाज घ्यावा लागेल आताच काही सांगणं योग्य ठरणार नाही असं गांगुलीने सांगितलं. देश कोरोनाशी लढत असताना सहा शहरांमध्ये स्पर्धा खेळवण्याचा निर्णय चुकला असं वाटतं का असं विचारलं असता गांगुलीने, स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं त्यावेळी भारतात रुग्णसंख्या ही कमी होती. मुंबईत रुग्णसंख्या वाढलेली असतानाही आम्ही कोणलाही लागण न होऊ देता सामने योग्य पद्धतीने पार पाडले असं सांगितलं.

आयपीएल २०२० मध्ये बीसीसीआयने इंग्लंडच्या Restrata कंपनीला बायो सिक्युअर बबल तयार करण्याचं कंत्राट दिलं होतं. या कंपनीने २०२० चा सिझन यशस्वीरित्या पूर्ण करुन दाखवला होता. परंतू २०२१ साठी या कंपनीला बीसीसीआयने कंत्राट दिलं नाही. भारतात या कंपनीचं फारसं अस्तित्व नसल्यामुळे आम्ही इतर कंपनीचा विचार केल्याचं गांगुलीने स्पष्ट केलं. स्पर्धा मध्यावधीत स्थगित करावी लागल्यामुळे बीसीसीआयचं सुमारे २ ते अडीच हजार कोटींचं नुकसान होणार आहे. त्यामुळे बीसीसीआय उर्वरित सामन्यांसाठी काय नियोजन करतं याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

IPL 2021 : बनावट ID कार्डाद्वारे दोन बुकींनी भेदलं Bio Secure Bubble चं कवच

    follow whatsapp