Ind vs Eng : Virat – Shardul Thakur ने राखली टीम इंडियाची लाज, पहिल्या डावात १९१ पर्यंत मजल

मुंबई तक

• 04:29 PM • 02 Sep 2021

कॅप्टन विराट कोहली आणि अखेरच्या फळीत मुंबईकर शार्दुल ठाकूरने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने आव्हानात्मक धावसंख्या गाठली आहे. पहिल्या डावात भारतीय संघ खराब सुरुवातीनंतर १९१ रन्सपर्यंत मजल मारु शकला. विराट कोहलीच्या ५० तर शार्दुल ठाकूरच्या धडाकेबाज ५७ रन्सच्या खेळीने भारताची बाजू आज सावरली. टॉस जिंकून इंग्लंडचा कॅप्टन जो रुटने पहिल्यांदा बॉलिंगचा […]

Mumbaitak
follow google news

कॅप्टन विराट कोहली आणि अखेरच्या फळीत मुंबईकर शार्दुल ठाकूरने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने आव्हानात्मक धावसंख्या गाठली आहे. पहिल्या डावात भारतीय संघ खराब सुरुवातीनंतर १९१ रन्सपर्यंत मजल मारु शकला. विराट कोहलीच्या ५० तर शार्दुल ठाकूरच्या धडाकेबाज ५७ रन्सच्या खेळीने भारताची बाजू आज सावरली.

हे वाचलं का?

टॉस जिंकून इंग्लंडचा कॅप्टन जो रुटने पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. रोहित आणि राहुल या दोन सलामीवीरांनी सावध सुरुवात केली. परंतू ख्रिस वोक्सच्या एका बॉलवर रोहित शर्मा फसला आणि भारताला पहिला धक्का बसला. यानंतर थोड्या वेळाने लोकेश राहुलही रॉबिन्सनच्या बॉलिंगवर माघारी परतला. चेतेश्वर पुजाराचा खराब फॉर्म या सामन्यातही कायम राहिला. अवघ्या ४ धावांवर अँडरसनने त्याला माघारी धाडलं. भारताने या सामन्यात प्रयोग म्हणून चौथ्या जागेवर अजिंक्य रहाणेऐवजी रविंद्र जाडेजाला संधी दिली.

परंतू भारताची ही खेळी पूर्णपणे फसली. ख्रिस वोक्सने जाडेजाला आऊट केलं. यानंतर विराट कोहलीने अजिंक्य रहाणेच्या साथीने थोडावेळा संघाची पडझड रोखली. यादरम्यान विराटने आपलं अर्धशतकही पूर्ण केलं. परंतू यानंतर लगेचच तो रॉबिन्सनच्या बॉलिंगवर बाद झाला, त्याने ५० रन्स केल्या. यानंतर अजिंक्य रहाणे, ऋषभ पंतही निराशा करुन माघारी परतले.

यानंतर मैदानावर आलेल्या शार्दुल ठाकूर उमेश यादवच्या साथीने सामन्याचं चित्रच बदललं. इंग्लंडच्या बॉलर्सचा समाचार घेत शार्दुलने मैदानात चौकार-षटकार लगावण्यास सुरुवात केली. शार्दुलच्या या आक्रमक खेळीमुळे इंग्लंडचा संघही काहीकाळ बॅकफूटला ढकलला गेला. शार्दुलने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. परंतू यानंतर फटकेबाजीच्या नादात तो आऊट झाला. यानंतर भारताचे उर्वरित तळातले फलंदाज फारशी चमक दाखवू शकले नाहीत आणि भारताचा डाव १९१ रन्सवर संपला. इंग्लंडकडून ख्रिस वोक्सने ४, ओली रॉबिन्सनने ३ तर अँडरसन आणि ओव्हरटन यांनी १-१ विकेट घेतली.

Ind vs Eng : गुडघ्यातून भळाभळा रक्त येत असतानाही Anderson बॉलिंग करत राहिला, सोशल मीडियावर कौतुक

    follow whatsapp