Ind vs NZ : सामन्यावर टीम इंडियाची मजबूत पकड, दुसऱ्या दिवसाअखेरीस 332 धावांची आघाडी

मुंबई तक

• 02:40 AM • 05 Dec 2021

मुंबईच्या वानखेडे मैदानावर सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यावर टीम इंडियाने पूर्णपणे वर्चस्व मिळवलं आहे. एजाज पटेलने पहिल्या डावात १० विकेट घेत टीम इंडियाचा डाव ३२५ धावांवर संपवला. मात्र यानंतर भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करत न्यूझीलंडची इनिंग अवघ्या ६२ धावांवर संपवत पहिल्या डावात २६३ धावांची आघाडी घेतली. भारताविरुद्ध कसोटी सामन्यातली न्यूझीलंडची ही आतापर्यंतची सर्वात निचांकी धावसंख्या […]

Mumbaitak
follow google news

मुंबईच्या वानखेडे मैदानावर सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यावर टीम इंडियाने पूर्णपणे वर्चस्व मिळवलं आहे. एजाज पटेलने पहिल्या डावात १० विकेट घेत टीम इंडियाचा डाव ३२५ धावांवर संपवला. मात्र यानंतर भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करत न्यूझीलंडची इनिंग अवघ्या ६२ धावांवर संपवत पहिल्या डावात २६३ धावांची आघाडी घेतली.

हे वाचलं का?

भारताविरुद्ध कसोटी सामन्यातली न्यूझीलंडची ही आतापर्यंतची सर्वात निचांकी धावसंख्या आहे. संपूर्ण न्यूझीलंड संघात सलामीवीर टॉम लॅथम आणि अखेरच्या फळीत काएल जेमिन्सन हे दोनच फलंदाज दोन आकडी धावसंख्या गाठू शकले. याव्यतिरीक्त अन्य सर्व फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर नांगी टाकली.

न्यूझीलंडच्या डावाची सुरुवातच अडखळती झाली. मोहम्मद सिराजने कर्णधार टॉम लॅथम, विल यंग आणि अनुभवी रॉस टेलर यांना माघारी धाडत न्यूझीलंडला धक्का दिला. या सुरुवातीच्या धक्क्यांमधून न्यूझीलंडचा संघ सावरुच शकला नाही. यानंतर रविचंद्रन आश्विनने आपल्या फिरकीच्या जाळ्यात न्यूझीलंडला अडकवत भारताची बाजू वरचढ केली. अखेरच्या फळीत जेमिन्सनने १७ रन्स करत भारतीय गोलंदाजांचा सामना करण्याचा प्रयत्न केला.

परंतू त्याचे प्रयत्नही तोकडेच पडले. भारतीय गोलंदाजांनी वानखेडेच्या खेळपट्टीचा पुरेपूर फायदा घेत न्यूझीलंडला बॅकफूटला ढकललं. पहिल्या डावात भारताला न्यूझीलंडला फॉलोऑन देण्याची संधी होती. परंतू विराट कोहलीने फॉलोऑनचा निर्णय न घेता पुन्हा फलंदाजी करणं पसंत केलं. भारताकडून पहिल्या डावात आश्विनने ४, सिराजने ३, अक्षर पटेलने दोन तर जयंत यादवने १ विकेट घेतली.

Ind vs NZ : वानखेडे मैदानावर १० विकेट घेणारा Ajaz Patel आहे मुंबईकर, जाणून घ्या त्याच्याविषयी

दरम्यान दुसऱ्या डावात शुबमन गिलला झालेल्या दुखापतीमुळे मयांक अग्रवालच्या सोबतीलाच चेतेश्वर पुजारा फलंदाजीसाठी आला. दोन्ही फलंदाजांनी आक्रमक पवित्रा आजमावत अखेरच्या सत्रात सुरेख फटकेबाजी केली. दोघांनीही अखेरचं सत्र खेळून काढत दुसऱ्या दिवसाअखेरीस भारताला एकही विकेट न गमावता ६९ रन्सपर्यंत मजल मारुन दिली. ज्यामुळे भारताकडे दुसऱ्या दिवसालाच ३३२ धावांची आघाडी जमा झाली आहे. त्यामुळे तिसऱ्या दिवशी भारतीय संघ आपला डाव कधी घोषित करतो आणि न्यूझीलंडला विजयासाठी किती धावांचं आव्हान देतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp