कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मध्यावधीत स्थगित करावा लागलेला आयपीएल २०२१ चा उर्वरित हंगाम १९ सप्टेंबरपासून सुरु करणार आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना खेळवला जाणार आहे. BCCI ने आज याबद्दल अधिकृत घोषणा केली आहे.
ADVERTISEMENT
ANI वृत्तसंस्थेशी बोलत असताना एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या तारखांसंबंधी माहिती दिली. “होय, मुंबई विरुद्ध चेन्नई या सामन्याने १९ सप्टेंबरपासून उर्वरित हंगामाला सुरुवात होईल. क्वालिफायर १ आणि २ सामने १० आणि १३ ऑक्टोबरला खेळवले जातील तर एलिमिनेटर सामना ११ ऑक्टोबरला खेळवला जाईल”, अशी माहिती दिली.
अबुधाबी, शारजाह आणि दुबई अशा तिन मैदानांवर उर्वरित सामने खेळवले जातील. १९ तारखेला स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात अबुधाबीच्या मैदानावर पहिला सामना खेळवला जाईल. शारजाहच्या मैदानावर २४ सप्टेंबर रोजी RCB vs CSK सामना खेळवला जाईल. २७ दिवसांमध्ये बीसीसीआयने ३१ सामन्यांचं आयोजन करायचं ठरवलं आहे.
उर्वरित हंगामात एकून ७ डबल हेडर सामने खेळवले जातील. दुपारी खेळवले जाणारे सामना भारतीय वेळेनुसार २ वाजता तर संध्याकाळचे सामने रात्री साडेसात वाजता सुरु होतील. ८ ऑक्टोबर रोजी RCB vs DC यांच्यात अखेरचा साखळी सामना खेळवला जाईल. अंतिम सामना १५ सप्टेंबरला खेळवला जाईल.
मागच्या आठवड्यात बीसीसीआयने आयपीएलचं आयोजन युएईमध्ये करण्यासंबंधी एक आढावा बैठक घेतली. ज्यात सचिव जय शहा यांनी युएई सरकारमधील मंत्री आणि अधिकाऱ्यांशीही चर्चा केली. जय शहांनी ट्विटरवर या भेटीचे फोटो पोस्ट केले आहेत.
भारतात बायो सिक्युअर बबलचे नियम मोडून खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे हा हंगाम मध्यावधीत स्थगित करावा लागला होता. यानंतर देशातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता टी-२० विश्वचषकाचं आयोजनही बीसीसीआयने युएईत हलवलं. त्यामुळे बीसीसीआयने आयपीएलची स्पर्धाही युएईत भरवण्याचा निर्णय घेतला. दोन्ही स्पर्धा लागोपाठ एकाच देशात असल्यामुळे जास्तीत जास्त परदेशी खेळाडू या स्पर्धेसाठी उपलब्ध होतील अशी खात्री बीसीसीआयला आहे.
ADVERTISEMENT