IND VS PAK T20 World Cup 2021: टीम इंडियाला प्रचंड मोठा धक्का, पहिल्याच सामन्यात पाककडून लाजिरवाणा पराभव

मुंबई तक

• 05:32 PM • 24 Oct 2021

दुबई: टी-20 वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला प्रचंड मोठा धक्का बसला आहे. विश्वचषकाचे दावेदार म्हणून पाहिलं जाणाऱ्या टीम इंडियाला पाकिस्तानने पराभवाची धूळ चारली आहे. टीम इंडियासाठी लाजिरवाणी बाब म्हणजे या सामन्यात भारतीय संघाला एकाही पाकिस्तानी खेळाडूची विकेट घेता आली नाही. त्यामुळे पाकिस्तानने हा सामना तब्बल 10 विकेट राखून जिंकला आहे. टी-20 विश्वचषकात पहिल्याच सामन्यात भारताला […]

Mumbaitak
follow google news

दुबई: टी-20 वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला प्रचंड मोठा धक्का बसला आहे. विश्वचषकाचे दावेदार म्हणून पाहिलं जाणाऱ्या टीम इंडियाला पाकिस्तानने पराभवाची धूळ चारली आहे. टीम इंडियासाठी लाजिरवाणी बाब म्हणजे या सामन्यात भारतीय संघाला एकाही पाकिस्तानी खेळाडूची विकेट घेता आली नाही. त्यामुळे पाकिस्तानने हा सामना तब्बल 10 विकेट राखून जिंकला आहे.

हे वाचलं का?

टी-20 विश्वचषकात पहिल्याच सामन्यात भारताला पाकिस्तानविरुद्ध लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं. या सामन्यात पाकिस्तानने टॉस जिंकत भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं. पण भारतीय संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली आहे.

भारताचा सलामीवीर रोहित शर्मा हा शून्यावर बाद झाला. शाहीन आफ्रिदीच्या एका शानदार चेंडूवर रोहित शर्मा बाद झाला. तर त्यानंतर अवघ्या 3 रन्सवर सलामीवीर केएल राहुल देखील बाद झाला. इथेच खऱ्या अर्थाने टीम इंडिया बॅकफूटवर गेली.

सुरुवातीलाच पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी याने भारतीय संघाला दोन मोठे धक्के दिले. याशिवाय इतर पाकिस्तानी गोलंदाजांनी देखील चांगली गोलंदाजी करत भारतीय संघाला 20 ओव्हरमध्ये 151 धावांवरच रोखलं. यावेळी पाकिस्तानच्या गोलंदाजांनी 7 भारतीय फलंदाजांना माघारी पाठवलं. तर भारतीय संघाला पाकिस्तानची एकही विकेट घेता आली नाही.

प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाकडून फक्त कर्णधार विराट कोहलीच अर्धशतक झळकावू शकला. त्याच्याशिवाय फक्त रिषभ पंतने 39 धावा केल्या. पण या दोघांव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला फार धावा करता आल्याच नाही.

दुसरीकडे गोलंदाजीत तर भारतीय गोलंदाजांनी साफ म्हणजे साफ निराशा केली. पाकिस्तानसमोर 152 धावांचं आव्हान असताना देखील भारतीय गोलंदाजांना पाकिस्तानचा एकही बळी मिळवता आला नाही.

T-20 World Cup : लोकेश राहुलवर अन्याय, नो-बॉलकडे थर्ड अंपायरची डोळेझाक?

आपला पहिलाच विश्वचषक खेळणाऱ्या सूर्यकुमार यादव आणि वरुण चक्रवर्ती यांना फारशी कमाल दाखवता आली नाही. तर त्याशिवाय गोलंदाजीत जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार आणि रवींद्र जडेजा यांनी खूपच निराशा केली.

टी-20 विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात ते देखील पाकिस्तानकडून अशा प्रकारे पराभवाला सामोरं जावं लागल्याने भारतातील संपूर्ण क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येत आहे. विश्वचषकाची सुरुवात पराभवाने झाल्याने आता पुढील सर्व सामने जिंकण्यासाठी टीम इंडियावर बराच दबाव असणार आहे.

खरं म्हणजे आजवर भारतीय संघाने एकाही विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवला नव्हता. पण आजच्या या विजयाने अनेक वर्षांची परंपरा मोडीत काढली. त्यामुळे भारतीय संघासाठी आजचा हा पराभव खूपच जिव्हारी लागला आहे.

    follow whatsapp