कॅप्टन म्हणून अखेरचा टी-२० वर्ल्डकप खेळणाऱ्या विराट कोहलीचं विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न अखेरीस स्वप्नच राहणार आहे. युएईत सुरु असलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडने अफगाणिस्तानवर मात केल्यामुळे भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे. न्यूझीलंडने ८ विकेट राखून सामना जिंकत सेमीफायनलमध्ये आपलं स्थान निश्चीत केलं आहे.
ADVERTISEMENT
२०१२ च्या स्पर्धेनंतर आयसीसीच्या स्पर्धेतून साखळी फेरीतून गाशा गुंडाळावा लागण्याची टीम इंडियाची ही पहिलीच वेळ आहे. न्यूझीलंडव्यतिरीक्त अ गटातून ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड तर ब गटात पाकिस्तानने सेमी फायनलची फेरी गाठली आहे. विराट कोहलीचा भारतीय संघ यंदाची स्पर्धा जिंकण्यासाठी प्रमुख दावेदार मानला जात होता.
परंतू स्पर्धेतल्या पहिल्याच दोन सामन्यांमध्ये टीम इंडियाला पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून सपाटून पराभव पत्करावा लागला. ज्यामुळे भारताचं स्पर्धेतलं आव्हान धोक्यात आलं. यानंतर टीम इंडियाने अफगाणिस्तान आणि स्कॉटलंडचा धुव्वा उडवत आपली आशा कायम ठेवली. परंतू न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यातले फासे हे टीम इंडियाच्या बाजूने पडले नाहीत आणि भारत स्पर्धेबाहेर फेकला गेला.
बहुचर्चित सामन्यात अफगाणिस्तानने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींगचा निर्णय घेतला. परंतू त्यांचा हा निर्णय सामन्यात पूर्णपणे फसला. हजरतउल्ला झझाई, मोहम्मद शहझाद, रहमानुल्लाह गुरबाज हे आघाडीचे फलंदाज झटपट माघारी परतले. यानंतर मधल्या फळीत गुलबदीन नैब, नझीबउल्ला झरदान आणि मोहम्मद नबी यांनी मैदानावर तग धरुन संघाचा डाव सावरला. झरदानने ४८ बॉलमध्ये ६ फोर आणि ३ सिक्स लगावत ७३ रन्स केल्या. झरदानच्या या इनिंगमुळे अफगाणिस्तानचा संघ १२४ धावांपर्यंत मजल मारु शकला.
प्रत्युत्तरादाखल न्यूझीलंडची सुरुवात सावध झाली. मुजीब उर रेहमानने डॅरेल मिचेलला आऊट करत न्यूझीलंडला पहिला धक्का दिला. यानंतर केन विल्यमसन आणि मार्टीन गप्टील यांनी छोटेखानी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. राशिद खानने गप्टीलला क्लिन बोल्ड करत न्यूझीलंडला आणखी एक धक्का दिला. परंतू तोपर्यंत पाणी पुलाखालून वाहून गेलं होतं. विल्यमसन आणि कॉनवे जोडीने नंतर संघाची अधिक पडझड होणार नाही याची काळजी घेत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
ADVERTISEMENT