महाराष्ट्राचा युवा कर्णधार ऋतुराज गायकवाडने आगामी दक्षिण आफ्रिदा दौऱ्यासाठी आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवत निवड समितीला आपली दखल घ्यायला भाग पाडली आहे. विजय हजारे ट्रॉफीत खेळत असताना ऋतुराजने सलग तीन सामन्यात शतकी खेळी करुन आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे.
ADVERTISEMENT
मध्य प्रदेश आणि छत्तीसगड विरुद्ध सामन्यात शतकी खेळी केल्यानंतर ऋतुराजने आज केरळच्या गोलंदाजांचा समाचार घेत शतक झळकावलं आहे. टॉस जिंकून महाराष्ट्राने या सामन्यात पहिल्यांदा बॅटींगचा निर्णय घेतला आहे.
ऋतुराजला राहुल त्रिपाठीनेही आज उत्तम साथ दिली. परंतू आजच्या सामन्यात राहुल त्रिपाठीचं शतक अवघ्या एका धावेने हुकलं. केरळ विरुद्ध पहिल्यांदा फलंदाजी करताना महाराष्ट्राची सुरुवात खराब झाली. अंकित बावणे आणि वाय. नाहर ही जोडी स्वस्तात माघारी परतली. यानंतर ऋतुराज आणि राहुल त्रिपाठी जोडीने तिसऱ्या विकेटसाठी १९५ धावांची भागीदारी रचत महाराष्ट्राचा डाव २ बाद २२ वरुन २१७ पर्यंत नेऊन ठेवला.
ऋतुराजने १२९ बॉलमध्ये ९ चौकार आणि ३ षटकार लगावत १२४ धावा केल्या. राहुल त्रिपाठीने ११ चौकारांसह ९९ धावांची इनिंग खेळली.
छत्तीसगड विरुद्ध सामन्यात ऋतुराजने नाबाद १५४ धावा चोपल्या होत्या. यापैकी ८६ धावा तर ऋतुराजने फक्त चौकार आणि षटकारांच्या सहाय्याने केल्या. या सामन्यात महाराष्ट्राने ८ विकेट राखत विजय मिळवला. मध्य प्रदेशविरुद्धच्या सामन्यात ३२९ धावांचा पाठलाग करताना ऋतुराजने १३६ रन्स केल्या होत्या. त्यामुळे आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन-डे मालिकेत ऋतुराजला भारतीय संघात स्थान मिळतंय की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT