टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर टीम इंडिया मोठे फेरबदल होणार असल्याचे संकेत मिळत आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली एकदिवसीय आणि टी-२० संघाचं कर्णधारपद सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT
‘टाईम्स ऑफ इंडिया’ने बीसीसीआय सूत्रांच्या हवाल्याने विराट कोहली कर्णधार पदाची जबाबदारी रोहित शर्माकडे सोपवणार असल्याचं वृत्त दिलं आहे. टी-२० विश्वचषकानंतर भारतीय क्रिकेट संघात मोठे फेरबदल होणार असल्याची चर्चा सुरू आहे.
विराट कोहली सध्या भारतीय क्रिकेट संघाचं कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० या तिन्ही प्रकारात भारतीय नेतृत्व करतो. मात्र, बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे कोहली एकदिवसीय आणि टी-२० संघाचं कर्णधारपद सोडणार आहे.
विराट कोहली, रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापन यांच्यात मागील काही दिवसांपासून याबद्दल चर्चा सुरू होती. याबद्दल लवकरच निर्णय होण्याची शक्यता असून, टी-२० विश्वचषकानंतर संघात मोठे फेरबदल होणार असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे.
विराट कोहलीनंतर रोहित शर्माकडे एकदिवसीय आणि टी-२० संघाचं कर्णधार पद दिलं जाणार असल्याची वृत्त आहे. तर विराट कोहली फक्त कसोटी संघाचंच नेतृत्व करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचा कर्णधार असलेल्या विराट कोहलीला फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करायचं आहे. त्यामुळे तो हा निर्णय घेत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळेच कर्णधारपदाची जबाबदारी रोहित शर्मासोबत वाटून घेण्याचा निर्णय विराटने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
विराट कोहलीने याबद्दल रोहित शर्माला कल्पना दिलेली असून, आता बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापनालाही कळवलं असल्याचं सांगण्यात येत आहे.
विराट कोहलीने ६५ कसोटी, ९५ एकदिवसीय आणि ४५ टी-२० सामन्यात भारतीय संघाचं कर्णधारपद भूषवलं आहे. यापैकी ३८ कसोटी सामन्यात विजय मिळवलेला आहे. तर ६५ एकदिवसीय आणि २९ टी-२० सामन्यात विजयी कामगिरी केली आहे.
ADVERTISEMENT