अहमदाबादच्या पिचवर भारतीय संघाने इंग्लंडवर १० विकेट राखून दणदणीत मात केली. अवघ्या दोन दिवसांमध्ये ही टेस्ट मॅच संपल्यामुळे इंग्लंडचे माजी प्लेअर्स पिचची कंडीशन खराब होती असं म्हणत सध्या सोशल मीडियावर बोटं मोडत आहेत. परंतू सर जेफ्री बॉयकॉट यांनी इंग्लंडच्या टीमच्या खराब कामगिरीवर खरमरीत टीका केली आहे. अहमदाबादच्या टर्निंग पिचवर ३ फास्ट बॉलर खेळवण्याची कल्पना कोणाला सुचली हे मला जाणून घ्यायचंय असं म्हणज बॉयकॉट यांनी इंग्लंडला खडे बोल सुनावले आहेत.
ADVERTISEMENT
अवश्य वाचा – World Test Championship: मॅच जिंकल्यानंतरही भारतावर संकट कायम
दुसऱ्या टेस्ट मॅचसाठी इंग्लंडने आपल्या संघात जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड आणि जोफ्रा आर्चर यांना संघात स्थान दिलं. जॅक लिचच्या रुपाने इंग्लंडच्या संघात केवळ एकच स्पिनर होता. फास्ट बॉलरना यश मिळत नाही हे पाहिल्यानंतर कॅप्टन जो रुटने स्वतःच्या हातात सूत्र घेतली आणि ५ विकेट घेत सर्वांना थक्क केलं. इंग्लंडच्या संघाला आपल्या कामगिरीची लाज वाटायला पाहिजे अशा शब्दांत बॉयकॉट यांनी इंग्लंडवर टीका केलीये.
“ज्या पिचवर बॉल टर्न होणार आहे हे माहिती असतानाही संघात ३ फास्ट बॉलर खेळवण्याची कल्पना कोणाला सूचली हे मला जाणून घ्यायचं आहे. इंग्लंडच्या संघाला आपण पिंक बॉल टेस्ट एडिलेड नाही तर अहमदाबादच्या पिचवर खेळतोय हे माहिती होतं असं वाटत नव्हतं.” बॉयकॉट यांनी डेली टेलिग्राफ मध्ये लिहीलेल्या कॉलममध्ये आपलं मत मांडलं. भारताकडून अक्षर पटेलने दोन्ही इनिंगमध्ये मिळून ११ विकेट्स घेत इंग्लंडच्या डावाला खिंडार पाडलं. या सिरीजमधला अखेरची टेस्ट मॅचही याच मैदानावर खेळवली जाणार आहे.
ADVERTISEMENT