भाजपच्या नेत्यांकडून पैगंबर मोहम्मद यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं गेलं. त्यानंतर हा मुद्दा शमलेला नाही. या घटनाक्रमानंतर भारतीय दुतांनाही निलंबित केलं गेलं. तसंच आखाती देशांनी तिखट प्रतिक्रिया दिल्या आहेत. या प्रकरणानंतर नुपूर शर्मा यांचं निलंबन केलं गेलं. तसंच नवीन कुमार जिंदल यांनाही पदच्युत करण्यात आलं आता या प्रकरावर नसरूद्दीन शाह यांनीही भाष्य केलं आहे.
एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत नसरूद्दीन शाह यांनी हे म्हटलं आहे की या प्रकरणी आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi) पुढे येऊन हे तिरस्काराचं विष पसरवणारे जे लोक आहेत त्यांना थांबवलं पाहिजे. ऋषीकेश या ठिकाणी जी धर्म संसद आयोजित करण्यात आली होती त्यात ज्या गोष्टी समोर आल्या त्यावर जर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विश्वास असेल तर मोदींनी तसं सांगावं आणि नसेल तर त्यांची भूमिका मांडावी.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ट्विटरवर ज्या तिरस्कार पसरवणारे फॉलोअर्सना फॉलो करतात त्यांच्या बाबत त्यांनी काहीतरी केलं पाहिजे. तिरस्काराचं विष वाढणार नाही याची काळजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली पाहिजे. त्यासाठी आवश्यक असलेली कठोर पावलं त्यांनी उचलली पाहिजेत असं नसरूद्दीन शाह यांनी म्हटलं आहे.
एवढंच नाही तर नुपूर शर्मा प्रकरणात जी कारवाई मोदी सरकारकडून करण्यात आली त्यालाही बराच उशीर झाला होता. नुसतं निलंबन करून त्यांनी काय साध्य केलं? काहीतरी मेसेज जायला हवा होता ज्यातून त्यांनी ही कारवाई केल्याचं समोर आलं असतं. लोकांमध्ये योग्य समज येणं आवश्यक आहे. ती येईल हे मला माहित आहे हेही नसरूद्दीन शाह यांनी म्हटलं आहे.
या लोकांमध्ये चांगली भावना निर्माण होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुढाकार घेतला पाहिजे. तसंच धर्मसंसदेत (हरिद्वार) जे बोललं गेलं त्यावर त्यांचा विश्वास असेल तर त्यांनी तसं सांगावं आणि नसेल तर तसंही स्पष्ट करावं असं आवाहन नसीरुद्दीन शाह यांनी केलं आहे.