Maharashtra weather forecast 5 days : महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला असून, सोमवारपासून राज्यातील काही भागात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून, पुण्यासह काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. (maharashtra, Mumbai, Pune weather news)
ADVERTISEMENT
राज्यातील अनेक भागात पावसाने दांडी मारल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. अशातच आता हवामान विभागाकडून दिलासादायक अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाच्या ताज्या माहितीनुसार पुढील 4-5 दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार असून, काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो.
वाचा >> Mumbai Bandstand video : ‘मुलगी ओरडत राहिली, लाट आली अन्…’, फोटोच्या नादात गेला जीव
‘पुढील 4-5 दिवस मान्सून सक्रीय राहण्याची शक्यता असून, कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. मोसमात पहिल्यांदाच मराठवाड्यातही मुसळधार पावसाचा इशारा आहे. कोकण व विदर्भात काही भागात मुसळधार पावसाची शक्यता असून, चंद्रपूरमध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो’, असं हवामान विभागाच्या पुणे केंद्राचे अतिरिक्त संचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रात पावसाचा जोर का वाढणार?
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हा पट्टा उत्तर पश्चिम दिशेने आत जाण्याची शक्यता असून, त्यानंतर 19 जुलै रोजी आणखी एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहेत. या बदलामुळे महाराष्ट्रासह मध्य भारतातील काही भागांत पावसाचा जोर वाढू शकतो, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
वाचा >> 5 जण समुद्रात गेले अन्… मुंबईतील मार्वे बीचवर तीन मुले बुडाली!
कोणत्या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट?
सोमवारपासून (17 जुलै) राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून, पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, ठाण्यासह कोकणात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.
मंगळवार, बुधवारी (18-19 जुलै) कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. पुणे, रत्नागिरी, रायगड, पालघर, सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावतीसह मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT