Amit Shah Eknath Shinde Meeting : महायुतीचे जागावाटप जवळपास निश्चित झाल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 32 पेक्षा अधिक जागा लढवण्याचा प्रयत्न आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 10 जागाच मिळू शकतात. विद्यमान 13 खासदार सोबत असल्याने शिंदे यांनी त्यांच्या जागा कायम ठेवण्याची विनंती केली. पण, शाहांनी त्यावर स्पष्ट उत्तर दिले. नेमकं काय घडलं याबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर होते. याच दौऱ्यात महायुतीच्या जागावाटपावर निर्णायक बैठक झाली. अमित शाहांनी आधी एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक घेतली. त्यानंतर शिंदे आणि फडणवीसांसोबत स्वतंत्र बैठका घेतल्या.
अमित शाहांच्या मध्यरात्रीपर्यंत बैठका
अमित शाह त्यांचा विदर्भ-मराठवाड्यातील दौरा आटोपून मंगळवारी मुंबईला आले. त्यानंतर रात्री उशिरा अमित शाह, शिंदे, फडणवीस आणि अजित पवार याच्यांमध्ये दीड तास बैठक झाली. त्यानंतर फडणवीस आणि अजित पवार निघून गेले.
पुढचे 45 मिनिट शिंदे, मुंबई भाजपचे प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार आणि अमित शाहांमध्ये बैठक झाली. यामध्ये मुंबईच्या जागांवर चर्चा झाली. या बैठकीत जागावाटपावर तोडगा निघून फॉर्म्युला ठरल्याची माहिती आहे.
हेही वाचा >> भाजपचं स्वप्न भंगणार, ठाकरे-शिंदे किती जागा जिंकणार, झोप उडवणारा पोल?
सूत्रांच्या माहितीनुसार भाजप 32 ते 25 जागा लढवणार असून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 2 ते 3 जागा दिल्या जाणार आहेत. यामध्ये बारामती, रायगड आणि शिरूर किंवा मावळची जागा असेल. तर जवळपास 10 जागा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला देण्याची तयारी अमित शाह यांनी दाखवली.
उरलेल्या 3-4 जागांवर शिवसेना किंवा राष्ट्रवादीचे उमेदवार लढू शकतात. पण, त्या उमेदवारांना भाजपच्या कमळ चिन्हावर लढावं लागेल, अशीही अट अमित शाहांनी घातल्याचे सूत्रांनी सांगितले.
अमित शाह-एकनाथ शिंदेंमध्ये काय झालं बोलणं?
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत १३ खासदार आहेत. माझ्या खासदारांची तिकीटं तरी कापू नका, अशी विनंती केली. त्यावर अमित शाह म्हणाले की, "हट्टाची भूमिका न घेता थोडी व्यवहार्य भूमिका घ्या. व्यवहार्य विचार करून जागा मागा. ज्या जागा जिंकू शकतो अशाच जागांबद्दल विचार करा", असे शाह यांनी सांगितले.
हेही वाचा >> भाजप 32 जागा, पवारांना 3, तर शिंदेंना फक्त...; शाहांनी काय सांगितलं?
भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवल्यास जिंकून येऊ शक्यता जास्त असल्याने भाजपकडून जास्तीत जास्त जागा लढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेलाच सर्वाधिक त्याग करावा लागणार आहे. त्यामुळे याचे पडसाद शिवसेनेत कसे उमटतात हे आगामी काळात दिसेल.
ADVERTISEMENT