“ज्यांनी बलात्कार आणि हत्या केल्या त्यांना…” बिलकिस बानो प्रकरणी जावेद अख्तर यांनी व्यक्त केला संताप

मुंबई तक

• 06:28 AM • 20 Aug 2022

बिलकिस बानो सामूहिक बलात्कार आणि ७ जणांच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावलेल्या ११ आरोपींना गुजरात सरकारने मुक्त केले. या घटनेमुळे २००२ मधील गुजरात दंगलीचा विषय चर्चेत आला आहे. पीडित बिलकिस बानो यांनी २० वर्षांपूर्वीचा आघात पुन्हा एकदा संकटाप्रमाणे तुटून पडलाय, अशा भावना व्यक्त केल्या आहेत. याच प्रकरणात आता गीतकार आणि कवी जावेद अख्तर यांनीही […]

Mumbaitak
follow google news

बिलकिस बानो सामूहिक बलात्कार आणि ७ जणांच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावलेल्या ११ आरोपींना गुजरात सरकारने मुक्त केले. या घटनेमुळे २००२ मधील गुजरात दंगलीचा विषय चर्चेत आला आहे. पीडित बिलकिस बानो यांनी २० वर्षांपूर्वीचा आघात पुन्हा एकदा संकटाप्रमाणे तुटून पडलाय, अशा भावना व्यक्त केल्या आहेत. याच प्रकरणात आता गीतकार आणि कवी जावेद अख्तर यांनीही संताप व्यक्त केला आहे. जावेद अख्तर यांनी केलेलं ट्विट चर्चेत आहे.

हे वाचलं का?

काय म्हटलं आहे जावेद अख्तर यांनी?

“ज्यांनी पाच महिन्यांच्या गर्भवती महिलेवर बलात्कार केला, तिच्या तीन वर्षांच्या मुलीसह कुटुंबातील सात जणांची हत्या केली, त्यांना तुरुंगातून सोडण्यात आलं. या लोकांना हार घालण्यात आला तसंच मिठाईही भरवण्यात आली. याचा विचार करण्याची गरज आहे. आपल्या समाजात काहीतरी अत्यंत चुकीचं घडतं आहे आणि हे खूप गंभीर आहे” या आशयाचं ट्विट जावेद अख्तर यांनी केलं आहे. जावेद अख्तर यांच्या ट्विटवर विविध प्रतिक्रिया उमटत आहे.

बिलकिस बानो सामूहिक बलात्कार प्रकरण काय?

“२७ फेब्रुवारी २००२ रोजी गुजरातमधील गोध्रा रेल्वे स्थानकावर साबरमती एक्स्प्रेसच्या बोग्या जाळण्यात आल्या. या गाडीतून अयोध्येतून कारसेवक परत आले होते. या दुर्घटनेत ५९ कारसेवकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर गुजरातमध्ये दंगली भडकल्या.

दंगलीतून वाचण्यासाठी बिलकिस बानो आणि त्यांचं कुटुंब गाव सोडून निघून गेलं. बिलकिस बानो आणि तिचं कुटुंब जिथे लपलेलं होतं, तिथे ३ मार्च २००२ रोजी २० ते ३० लोकांचा गट आला. काठ्या आणि तलवारीने त्यांनी बिलकिस बानोंच्या कुटुंबीयांवर हल्ला केला होता.

बिलकिस बानो यांच्यावर या लोकांनी सामूहिक बलात्कार केला. त्यावेळी बिलकिस बानो ५ महिन्यांच्या गर्भवती होत्या. इतकंच नाही, तर आरोपींनी बिलकिस बानो यांच्या कुटुंबातील ७ जणांच्या हत्या केल्या. या हल्ल्यावेळी ६ जण पळून गेले, त्यामुळे वाचले.

११ आरोपींना सोडण्याच्या निर्णयावर बिलकिस बानो काय म्हणाल्या?

“१५ ऑगस्ट २०२२ रोजी २० वर्षांपूर्वी माझ्यावर झालेला आघात पुन्हा एखाद्या संकटाप्रमाणे आदळला. जेव्हा मी ऐकलं की, ज्या ११ आरोपींनी माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलं. माझ्या डोळ्यांसमोर माझ्या संपूर्ण कुटुंबाला संपवलं. ज्यांनी माझी ३ वर्षांची मुलगी माझ्यापासून हिरावून घेतली. त्या सगळ्यांची सुटका करण्यात आली. ते आता आनंदित होऊन फिरत आहेत. हे ऐकल्यानंतर मला बोलण्यासाठी शब्दच सूचत नाहीयेत. मी सुन्न झालेय आणि निःशब्द झालेय”, असं बिलकिस बानो यांनी ११ जणांच्या सुटकेनंतर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

    follow whatsapp