‘न्याय व्यवस्थेवरील विश्वासालाही तडा गेला’; ११ आरोपींच्या सुटकेनंतर बिलकिस बानोंना भावना अनावर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बिलकिस बानो सामूहिक बलात्कार आणि ७ जणांच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावलेल्या ११ आरोपींना गुजरात सरकारने मुक्त केले. या घटनेमुळे २००२ मधील गुजरात दंगलीचा विषय चर्चेत आला आहे. पीडित बिलकिस बानो यांनी २० वर्षांपूर्वीचा आघात पुन्हा एकदा संकटाप्रमाणे तुटून पडलाय, अशा भावना व्यक्त केल्या आहेत.

११ आरोपींना सोडण्याच्या निर्णयावर बिलकिस बानो काय म्हणाल्या?

“१५ ऑगस्ट २०२२ रोजी २० वर्षांपूर्वी माझ्यावर झालेला आघात पुन्हा एखाद्या संकटाप्रमाणे आदळला. जेव्हा मी ऐकलं की, ज्या ११ आरोपींनी माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलं. माझ्या डोळ्यांसमोर माझ्या संपूर्ण कुटुंबाला संपवलं. ज्यांनी माझी ३ वर्षांची मुलगी माझ्यापासून हिरावून घेतली. त्या सगळ्यांची सुटका करण्यात आली. ते आता आनंदित होऊन फिरत आहेत. हे ऐकल्यानंतर मला बोलण्यासाठी शब्दच सूचत नाहीयेत. मी सुन्न झालेय आणि निःशब्द झालेय”, असं बिलकिस बानो यांनी ११ जणांच्या सुटकेनंतर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

“मी इतकंच म्हणू शकते की, एका महिलेला दिलेल्या न्यायाचा शेवट हाच आहे का? मी या देशातील सर्वोच्च न्यायालयावर विश्वास ठेवला. मी या व्यवस्थेवर विश्वास ठेवला. मी माझ्यावर झालेल्या आघाताची सवय करून घेत हळूहळू जगायला शिकत होते. पण, या ११ आरोपींच्या सुटकेनं माझी मनःशांती हिरावून घेतलीये आणि न्याय व्यवस्थेवरील माझ्या विश्वासालाही तडा गेलाय”, अशा भावना बिलकिस बानो यांनी व्यक्त केल्या आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

“माझं दुःख आणि अस्थिर झालेला आत्मविश्वास केवळ माझ्यासाठी नाही, तर त्या सर्व महिलांसाठी आहे, ज्या न्यायासाठी न्यायालयांमध्ये लढा देत आहेत. या आरोपींना मुक्त करण्यापूर्वी आणि अन्यायकारक निर्णय घेण्यापूर्वी कुणीही मला विचारलं नाही. माझ्या सुरक्षेबद्दल आणि माझी अवस्था पूर्वीसारखी होईल याबद्दल विचार केला गेला नाही”, असं बिलकिस बानो यांनी म्हटलं आहे.

बिलकिस बानो यांची गुजरात सरकारला विनंती

बिलकिस बानो यांनी यासंदर्भात गुजरात सरकारलाही विनंती केली आहे. “मी गुजरात सरकारला विनंती करते की, हा घातक निर्णय मागे घेण्यात यावा आणि शांततेत आणि निर्भयपणे जगण्याचा माझा अधिकार मला परत करावा. माझी आणि माझ्या कुटुंबियांची सुरक्षितता निश्चित करावी”, असं बिलकिस बानो यांनी म्हटलं आहे. हे निवेदन बिलकिस बानो यांच्यावतीने वकील शोभा यांनी प्रसिद्ध केलं आहे.

११ आरोपींच्या सुटकेबद्दल बिलकिस बानोचे पती काय म्हणाले?

बिलकिस बानो यांचे पती याकूब यांनीही ११ आरोपींच्या सुटकेवर नाराजी व्यक्त केलीये. “घरातील वातावरण खूप खराब आहे. आम्ही या निर्णयामुळे दुःखी आहोत. आम्ही आधीही भीतीच्या सावटाखालीच जगत होतो. आता दोषींनाच तुरुंगातून सोडण्यात आल्यामुळे भीती वाढली आहे. आम्हाला अद्याप कोणतीही सुरक्षा मिळालेली नाही. आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी राहत आलेलो आहोत. दोषींना शिक्षा ठोठावल्यानंतर आम्ही शांततेत जगत होतो. पण, आता भीती आणखी वाढलीये. आम्ही या घटनेत सर्व काही गमावून बसलेलो आहोत. आमच्या तीन वर्षांच्या मुलीचा जीव गेला”, अशी प्रतिक्रिया बिलकिस बानो यांचे पती याकूब यांनी या निर्णयावर दिलीये.

ADVERTISEMENT

बिलकिस बानो सामूहिक बलात्कार प्रकरण काय?

“२७ फेब्रुवारी २००२ रोजी गुजरातमधील गोध्रा रेल्वे स्थानकावर साबरमती एक्स्प्रेसच्या बोग्या जाळण्यात आल्या. या गाडीतून अयोध्येतून कारसेवक परत आले होते. या दुर्घटनेत ५९ कारसेवकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर गुजरातमध्ये दंगली भडकल्या.

ADVERTISEMENT

दंगलीतून वाचण्यासाठी बिलकिस बानो आणि त्यांचं कुटुंब गाव सोडून निघून गेलं. बिलकिस बानो आणि तिचं कुटुंब जिथे लपलेलं होतं, तिथे ३ मार्च २००२ रोजी २० ते ३० लोकांचा गट आला. काठ्या आणि तलवारीने त्यांनी बिलकिस बानोंच्या कुटुंबियांवर हल्ला केला होता.

बिलकिस बानो यांच्यावर या लोकांनी सामूहिक बलात्कार केला. त्यावेळी बिलकिस बानो ५ महिन्यांच्या गर्भवती होत्या. इतकंच नाही, तर आरोपींनी बिलकिस बानो यांच्या कुटुंबातील ७ जणांच्या हत्या केल्या. या हल्ल्यावेळी ६ जण पळून गेले, त्यामुळे वाचले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT