दिल्ली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या २२ प्रतिज्ञा वाचनावरुन वाद ताजा असतानच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांनी आपल्याला या २२ प्रतिज्ञांवर गर्व असल्याचं म्हटलं आहे. तसंच मी या प्रतिज्ञांचा स्वीकार करत असून आपणही सर्वांनी याचा स्वीकार करावा असं आवहान त्यांनी केलं आहे. याबाबत त्यांनी ट्वीट करुन आपली भूमिका मांडली आहे.
ADVERTISEMENT
सोबतचं माध्यमांशी बोलताना आठवले म्हणाले, बाबासाहेब आंबडेकर यांनी ऐतिहासिक धर्मांतर करतेवेळी देशभरातील लाखो अनुयायांना २२ प्रतिज्ञा दिल्या होत्या. या २२ प्रतिज्ञा आम्हाला मान्य आहेत. या प्रतिज्ञांचा आम्हाला अभिमान असून त्या बौद्ध आदर्श जीवनमार्ग शिकविणाऱ्या आहेत. आम्ही या प्रतिज्ञांचे पालन करतो, प्रत्येक बौद्धाने या प्रतिज्ञांचे पालन केले पाहिजे. २२ प्रतिज्ञांला माझा कायम पाठिंबा आहे, असे ते म्हणाले.
आठवलेंच्या भूमिकेमुळे भाजपची कोंडी?
दरम्यान, आठवलेंच्या या भूमिकेमुळे केंद्रातील सत्ताधारी भाजपची कोंडी झाली आहे का? असा सवाल आता विचारला जात आहे. त्याचं कारण म्हणजे दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री राजेंद्र पाल गौतम यांनी काही दिवसांपूर्वी धर्मांतर सोहळ्यात हजेरी लावली होती. त्यावेळी बौद्ध धर्म स्वीकारलेल्या लोकांनी आपण यापुढे हिंदू देवतांची प्रार्थना करणार नाही, अशी प्रतिज्ञा घेतली होती.
यावरुन भाजपनं मंत्री राजेंद्र पाल यांच्यासह आम आदमी पक्षालाही टीकेचे लक्ष्य केलं होतं. हिंदू देवदेवतांचा कथित अपमान झाल्याचा आरोप भाजपनं केला होता. यावरुन पाल यांनी माफीही मागितली होती. भाजपकडून अफवा पसरविण्याचे काम सुरू असून या अपप्रचाराने कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास मी क्षमा मागतो, असं त्यांनी म्हटलं होतं.
तसचं पाल यांनी मंत्रिपदाचा राजीनामाही दिला होता. माझ्यामुळे आमचे नेते अरविंद केजरीवाल किंवा आम आदमी पक्ष अडचणीत यावा अशी माझी इच्छा नाही. मी पक्षाचा सच्चा सैनिक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांच्या विचारांचे मी आयुष्यभर पालन करणार आहे, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता भाजपच्याच मंत्रिमंडळातील मंत्री आठवले यांनी या प्रतिज्ञांवर आपल्याला गर्व असल्याचं म्हटलं आहे.
ADVERTISEMENT