मुसळधार पावसामुळे कोकणात मोठं नुकसान झालं. चिपळूण-महाड या भागात पावसामुळे पुराचं पाणी लोकांच्या घरात शिरुन मोठं आर्थिक नुकसान झालं तर तळीये गावात भुस्खलनामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. पुराचं पाणी ओसरल्यानंतर आता राज्यातील नेत्यांच्या दौऱ्यांना सुरुवात झाली आहे. अनेक महत्वाचे नेते पूरग्रस्त भागाची पाहणी करत आहे. आज चिपळूण दौऱ्यावर असलेल्या पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंना स्थानिकांच्या रोषाचा सामना करावा लागला.
ADVERTISEMENT
तुम्ही पर्यावरणमंत्री असून काय केलंत? कोकणात काय चाललंय हे पाहिलं आहे का? अशा शब्दांमध्ये स्थानिकांनी आपली नाराजी व्यक्त केली. “इथली परिस्थिती काय आहे हे पहायला तुम्ही येत नाही. महिन्यातून एकदा तरी फेरी होते का तुमची? इथे आमच्या भागातला पूल वाहून गेला, गाळ अजुनही तसाच आहे. तो साफ करायची गरज आहे.” ज्यावर आदित्य ठाकरेंनी पूरग्रस्तांना पंचनामे झाल्यानंतर भरीव मदत दिली जाईल असं आश्वासन दिलं.
आदित्य ठाकरेंनी यावेळी पूरग्रस्तांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच यावेळी लहानग्या मुलांशी संवाद साधत त्यांची विचारपूसही केली. चिपळूण आणि महाड परिसरात आता पुराचं पाणी ओसरलेलं असलं तरीही आता सर्वत्र घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे. त्यामुळे मोडलेला हा संसार पुन्हा उभा करण्याचं आव्हान चिपळुणकरांसमोर आहे.
Chiplun Flood : घराची कौल फोडून आई-बाबांना बाहेर काढलं, मुलाच्या प्रसंगावधानामुळे वाचला कुटुंबाचा जीव
यावेळी उपस्थित पत्रकारांशी बोलत असताना आदित्य ठाकरे यांनी ही वेळ राजकारण बाजूला ठेवण्याची आहे. आपण सर्वमिळून लोकांसाठी काही ना काही करतच आहोत. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर लोकांना सर्वतोपरीने मदत केली जाईल. सध्या लोकांची आरोग्य तपासणी, घरगुती सामान पुरवणं, स्थलांतर अशा गोष्टींवर भर दिला जातोय. शिवसेना पक्ष म्हणूनही आमची मदत सुरुच असल्याचं आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलं.
ADVERTISEMENT