तातडीने हस्तक्षेप करा; देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

मुंबई तक

• 12:26 PM • 30 Aug 2021

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य माणसाची आर्थिक घडी विस्कटली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचीही परिस्थिती अशीच असून, वेळेवर पगार होत नसल्यानं एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना भेडसावत असलेल्या समस्यांकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि होत असलेल्या […]

Mumbaitak
follow google news

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य माणसाची आर्थिक घडी विस्कटली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचीही परिस्थिती अशीच असून, वेळेवर पगार होत नसल्यानं एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना भेडसावत असलेल्या समस्यांकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं आहे.

हे वाचलं का?

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि होत असलेल्या आत्महत्यांसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. यामध्ये तातडीने हस्तक्षेप करण्याची विनंती फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना केली आहे.

पत्रात काय म्हटलं आहे?

उद्धव ठाकरेजी,

मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

महोदय, एस.टी. महामंडळातील कर्मचाऱ्यांना नियमित वेतन मिळत नसल्याने अनेक कुटुंब प्रचंड आर्थिक संकटात आहेत. कुटुंबाचे अर्थचक्र संकटात सापडल्याने नाईलाजाने एस.टी. कर्मचाऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलणे सुरू केले आहे.

अहमदपूर, तेल्हारा, शहादा, कंधार आणि साक्री अशा अनेक ठिकाणी एस.टी. कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यापूर्वी गेल्यावर्षी सुद्धा जळगाव येथे वाहक मनोज चौधरी आणि रत्नागिरी येथे पांडुरंग गडदे या एस.टी. कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाल्यानंतर आपल्याशी पत्रव्यवहार केला होता.

नाशिक आणि इतरही भागात त्यानंतर आत्महत्यांचे सत्र सुरूच राहिले. धुळे जिल्ह्यातील साक्री येथे बेडसे या एस.टी कर्मचाऱ्याने आत्महत्या करताना लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत वेतन मिळत नसल्याने आत्महत्या करीत असल्याचं स्पष्टच लिहून ठेवले आहे.

असं असताना परिस्थिती नीट न हाताळता संताप व्यक्त करणाऱ्या त्यांच्या संतप्त नातेवाईकांविरुद्धच पोलिसांनी गुन्हे दाखल केले. या घटनेनं राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

माझी आपल्याला विनंती आहे की, एस.टी. कर्मचाऱ्यांच्या या व्यथांकडे तातडीने हस्तक्षेप करीत आपण लक्ष द्यावे आणि वेतनाच्या समस्येवर तोडगा काढावा व राज्यातील या कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा.

केवळ कर्मचारीच नाहीत, तर त्यांचे कुटुंबीय सुद्धा प्रचंड मानसिक आणि आर्थिक तणावाखाली आहेत. त्यामुळे आपल्या स्तरावर या गंभीर प्रश्नाची तत्काळ सोडवणूक करावी, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp