गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांनी पहिल्याच दिवशी केलं मोठं वक्तव्य, पाहा काय म्हणाले

मुंबई तक

• 12:08 PM • 06 Apr 2021

मुंबई: राज्याचे नवे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज आपल्या खात्याचा कारभार हाती घेतल्यानंतर एक छोटेखानी पत्रकार परिषद घेतली. पण याचं पत्रकार परिषदेत त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. यावेळी ते असं म्हणाले आहेत की, ‘पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांच्या निष्ठा काय आहेत त्या तपासाव्या लागतील आणि आवश्यकतेनुसार त्याप्रमाणे निर्णय घ्यावे लागतील.’ त्यामुळे वळसे-पाटील यांनी पहिल्याच दिवशी सर्व वरिष्ठ […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: राज्याचे नवे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज आपल्या खात्याचा कारभार हाती घेतल्यानंतर एक छोटेखानी पत्रकार परिषद घेतली. पण याचं पत्रकार परिषदेत त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. यावेळी ते असं म्हणाले आहेत की, ‘पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांच्या निष्ठा काय आहेत त्या तपासाव्या लागतील आणि आवश्यकतेनुसार त्याप्रमाणे निर्णय घ्यावे लागतील.’ त्यामुळे वळसे-पाटील यांनी पहिल्याच दिवशी सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना योग्य ते मेसेज दिलेला आहे.

हे वाचलं का?

अनिल देशमुख यांच्याकडे राज्याचं गृहखातं असताना देखील काही गुन्ह्याबाबत किंवा इतर अंतर्गत प्रकरणांची माहिती ही सर्वात आधी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जात होती. त्यावरुन अनिल देशमुखांवर बरीच टीका सुरु होती.

त्यामुळेच आता पहिल्याच दिवशी दिलीप वळसे-पाटील यांनी स्पष्ट केलं आहे की, कुणाच्या निष्ठा काय आहेत ते तपासावं लागेल. याचाच अर्थ आता आपल्या खात्यातील गोपनीय माहिती विरोधकांकडे जाऊ नये यासाठी नव्या गृहमंत्र्यांनी कंबर कसली आहे.

पाहा गृहमंत्री पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर वळसे-पाटील नेमकं काय म्हणाले:

‘गृह विभाग याला काटेरी मुकूट देखील म्हणता येईल. कारण हे खातं थेट दररोज घडणाऱ्या गोष्टींशी संबंधित आहे. त्यामुळे इथे एकाच वेळी अनेक गोष्टी घडत असतात. राज्यात आघाडीचं सरकार असलं तरीही तीनही पक्ष एकत्रितपणे निर्णय घेत आलं आहे आणि यापुढे देखील घेतील. गृहमंत्री पदाचा कार्यभार मी आजच स्वीकारला आहे. त्यामुळे मला पोलीस विभागाच्या प्रमुखांशी आणि सचिवांशी चर्चा करावी लागेल.’ असं दिलीप वळसे-पाटील यांनी स्पष्ट केलं.

‘राज्यातील पोलीस दल एकत्रित पणाने काम करतंय अशा प्रकारचं चित्र दिसायला पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न राहिल. गृहखात्याचा कारभार हा अतिशय स्वच्छ आणि पारदर्शक असला पाहिजे असा आमचा प्रयत्न असणार आहे. सध्या पोलीस दलातील एकूणच वातवरण लक्षात घेता सर्व माहिती घेतल्यानंतर अधिकाऱ्यांच्या काय निष्ठा आहेत हे तपासून याबाबतीत जसजसे आवश्यक वाटेल तसे निर्णय घ्यावे लागलीत.’ असं म्हणत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पहिल्याच दिवशी मोठं वक्तव्य केलं आहे.

दिलीप वळसे-पाटलांना पवारांनी गृहमंत्री का केलं?

‘खरं तर काल (५ एप्रिल) अचानक मला पक्षाकडून हे गृहमंत्री पद स्वीकारावं असं सांगण्यात आलं. त्यामुळे अनेक गोष्टींची मला सर्वप्रथम माहिती घ्यावी लागणार आहे. जिथे दुरुस्ती करणं आवश्यक आहे तिथे ती केली जाईल. सध्या हा फार कठीण काळ आहे. एकीकडे कोरोनाचं संकट आणि इतर गोष्टी सुरु आहेत. अशावेळी चॅलेजिंग जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली आहे.’ असंही वळसे-पाटील यावेळी म्हणाले.

‘माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गेली ५ वर्ष माजी गृहमंत्री देखील होते. त्यामुळे त्यांचे संबंध पोलीस खात्याशी होते. म्हणूनच त्यांना काही गोष्टींची माहिती मिळत असेल. पण आता आम्ही प्रयत्न करु की, यातून नेमका कसा मार्ग काढला पाहिजे आणि कारभारात कशी सुधारणा झाली पाहिजे.’ असं म्हणत वळसे-पाटील यांनी स्पष्ट केलं आहे की, यापुढे प्रशासनावर ते आपली पकड अधिक मजबूत करतील.

अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर गृहमंत्री होणारे दिलीप वळसे पाटील आहेत कोण?

कोण आहेत दिलीप वळसे पाटील?

दिलीप वळसे पाटील हे शांत स्वभावाचे पण मुरब्बी राजकारणी मानले जातात. ते जेव्हा विधानसभा अध्यक्ष होते तेव्हा त्यांचा उल्लेख हेडमास्तर असा केला जात असे. काटेकोर शिस्त पाळणारे आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांचा लौकिक आहे. माजी काँग्रेस आमदार आणि शरद पवारांचे जवळचे मित्र दत्तात्रय पाटील यांचे ते पुत्र. शरद पवारांचे स्वीय सचिव म्हणून त्यांनी काम सुरू केलं.

१९९० मध्ये त्यांनी पहिल्यांदा आंबेगाव मतदार संघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली. ही निवडणूक ते जिंकले त्यानंतर ते आजपर्यंत ते या मतदारसंघातून जिंकत आले आहेत.

१९९९ मध्ये दिलीप वळसे पाटील हे शरद पवारांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेले. त्यानंतर ते विलासराव देशमुखांच्या मंत्रिमंडळात मंत्रीही झाले. त्यावेळी त्यांच्याकडे उर्जा खातं आणि वैद्यकीय शिक्षण या दोन खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

त्यानंतर दिलीप वळसे पाटील यांच्याकडे अर्थ खातंही सोपवण्यात आलं होतं ही जबाबदारीही त्यांनी समर्थपणे सांभाळली.

२००९ ते २०१४ या कालावधीत दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले.

    follow whatsapp