आई आणि भावाच्या नात्याला काळीमा फासणार क्रूरकृत्य औरंगाबाद जिल्ह्यात घडलं आहे. प्रेमविवाह करणाऱ्या मुलीची तिच्याच आई आणि भावाने निर्घृणपणे हत्या केली. चहा बनवण्यासाठी स्वयपाक घरात गेलेल्या मुलीला तिथेच आईने पकडून ठेवलं आणि भावाने कोयत्याने वार करत शिर धडावेगळं केलं. वैजापूर तालुक्यातील लाडगाव येथे ही थरकाप उडवणारी घटना घडली.
ADVERTISEMENT
वैजापूर तालुक्यातील लाडगाव येथील अविनाश थोरे व नगिनापिंपळगाव येथील किर्ती उर्फ किशोरी मोटे या दोघांनी 21 जून 2021 रोजी प्रेमविवाह केला. 19 वर्षीय किर्तीने पुण्यातील आळंदी येथे प्रेमविवाह केला होता. या प्रेमविवाहाला किर्तीच्या कुटुंबाचा विरोध होता. मात्र, हळूहळू सर्व सुरळीत होईल या आशेने दोघंही औरंगाबादेतील लाडगाव परिसरातील शेतवस्तीवर राहण्यासाठी आले.
किर्ती शेतवस्तीवर राहायला आल्याची माहिती मिळाल्यानंतर तिचा भाऊ आणि आई शोभा मोटे भेटायला आले. यावेळी तिचा आजारी असलेला पती झोपलेला होता. आई आणि भाऊ भेटायला आल्याने किर्तीने आधी पाणी दिले आणि नंतर चहा बनवण्यासाठी किचनमध्ये गेली. किर्ती किचनमध्ये गेल्यावर तिच्यापाठोपाठ भाऊ आणि आईही किचनमध्ये गेले.
त्यानंतर किर्तीला ‘तू पळून प्रेमविवाह का केला?’ असं त्याने विचारलं. त्यावरून शाब्दिक वाद झाला आणि आईने किर्तीला पकडलं. त्यानंतर तिच्या भावाने सोबत आणलेल्या कोयत्याने थेट तिच्या गळ्यावरच वार केला. शिर धडावेगळं केल्यानंतर आरोपीनं क्रौर्याचा कळसच गाठला.
धडावेगळं केलेलं बहिणीचं शिर घेऊन आरोपी भाऊ घराबाहेरच्या ओट्यावर आला. यावेळी बाहेर असलेल्या लोकांना शिर दाखवत म्हणाला, ‘हीच काय केलं पहा’, असं म्हणाला. दरम्यान, किर्तीचं शिर बाहेर आणण्याआधी आरोपी किर्तीचा पती असलेल्या खोलीत तिचा भाऊ गेला. मात्र, तोपर्यंत किर्तीच्या आवाजाने तो जागा झाला होता. समोर कोयता घेऊन उभ्या असलेल्या भावाला बघून त्याने पळ काढत स्वतःचा जीव वाचवला.
या हत्याकांडानंतर मुलीची आई आणि भाऊ पोलीस ठाण्यात गेले. त्यांनी आत्मसमर्पण करत केलेल्या हत्येची कबुली दिली. या घटनेनं परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT