संपूर्ण देशासह महाराष्ट्रानेही कोरोनाच्या दोन लाटांचा सामना केला. या काळात राज्यातील उद्योगधंद्यांना बरचं आर्थिक नुकसान सहन करावं लागलं. महाराष्ट्र सरकारने सोमवारपासून राज्यात अनलॉकची घोषणा केली असून, रुग्ण पॉजिटीव्हीटीचा दर आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धता या निकषांवर हे अनलॉक केलं जाणार आहे. महाराष्ट्राच्या या मॉडेलंच उद्योग जगतातूनही कौतुक होताना दिसत आहे.
ADVERTISEMENT
उद्योगपती हर्ष गोएंका यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं असून महाराष्ट्राच्या या मॉडेलचं इतर राज्यांनीही अनुकरण करावं अशी सूचना केली आहे.
रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यातल्या बड्या उद्योगपतींसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा झाली. या बैठकीत अनलॉक प्रक्रियेवर चर्चा झाली असून मुख्यमंत्र्यांनी उद्योगपतींनाही सूचना दिल्या आहेत. आपल्याला लॉकडाउन आणि नॉकडाउन यांच्यामधला फरक आहे तो सांभाळायचा आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवत असताना एका बाजूला राज्याची अर्थव्यवस्थाही चांगल्या स्थितीत राहील याची काळजी घेतली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत स्पष्ट केलं.
Maharashtra Unlock News : आजपासून अनेक शहरांतील निर्बंध शिथील होणार
अनलॉक करताना महाराष्ट्राला अशी रणनिती आखायची आहे की सर्व देशासमोर आपलं चांगलं उदाहरण तयार व्हायला हवं. सध्या पूर्ण सवलत देता येणार नसल्यामुळे जे निकष आणि नियम आखून दिले आहेत त्या नियमांचं पालन करुन काम करणं आवश्यक आहे. साप मेला पाहिजे आणि काठीही तुटता कमा नये अशा स्वरुपात आपल्याला काम करणं गरजेचं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत सांगितलं.
Maharashtra Unlock : उपराजधानी नागपूरचा समावेश पहिल्या स्तरात, जिल्हाधिकाऱ्यांकडून Guideline जाहीर
यावेळी बोलत असताना मुख्यमंत्र्यांनी आगामी काळात येऊ शकणाऱ्या तिसऱ्या लाटेबद्दलही भाष्य केलं. भविष्यात तिसरी लाट आली तर लॉकडाउन लावण्याची वेळ येऊ शकते, अशावेळी उद्योगजगतावर याचा परिणाम होता कमा नये यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आरोग्य व्यवस्था बळकट करण्याकडे सरकार लक्ष देत असून लसींचा तुटवडा ही देखील राज्यासाठी एक चिंतेची बाब असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
या बैठकीत उद्योगपतींकडूनही काही सूचना देण्यात आल्या. कोरोनाबद्दल जनजागृती करण्याकडे अधिक भर देणं गरजेचं असून ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी अधिक काळजी घेणं गरजेचं असल्याचंही उद्योगपतींनी यावेळी सांगितलं. याचसोबत IT सेक्टरमध्ये काम करणाऱ्या लोकांना आणखी काही काळ वर्क फ्रॉम होम तसेच सोशल डिस्टन्सिंगचं पालन होण्यासाठी रस्त्यांवरील पोलीस चेक पोस्ट हटवण्याचाही सल्ला या बैठकीत देण्यात आला. अनेकदा पोलीस चेक पोस्टमुळे ट्रॅफिक होऊन बराच वेळ वाया जातो असंही उद्योगपतींनी या बैठकीत निदर्शनास आणून दिलं.
Maharashtra Unlock : BEST सेवा आजपासून मुंबईकरांच्या सेवेत
ADVERTISEMENT