Maharashtra@61 : कायदेतज्ज्ञ आणि लेखक नरेंद्र चपळगावकर सांगत आहेत महाराष्ट्रातले बदल

मुंबई तक

• 07:49 AM • 01 May 2021

मराठी भाषिकांचे राज्य म्हणजे महाराष्ट्र ते अस्तित्त्वात येऊन 61 वर्षे झाली आहेत. या राज्यात काही बदल झाले आहेत का? तर हो राज्यात अनेक चांगले बदल झाले आहेत असं न्या. (निवृत्त) नरेंद्र चपळगावकर यांनी म्हटलं आहे. या बदलांची नोंद घेऊनच आपल्याला आणखी काय करता येईल याचा विचार करणं आवश्यक आहे. पहिला बदल झाला आहे तो शिक्षण […]

Mumbaitak
follow google news

मराठी भाषिकांचे राज्य म्हणजे महाराष्ट्र ते अस्तित्त्वात येऊन 61 वर्षे झाली आहेत. या राज्यात काही बदल झाले आहेत का? तर हो राज्यात अनेक चांगले बदल झाले आहेत असं न्या. (निवृत्त) नरेंद्र चपळगावकर यांनी म्हटलं आहे. या बदलांची नोंद घेऊनच आपल्याला आणखी काय करता येईल याचा विचार करणं आवश्यक आहे.

हे वाचलं का?

पहिला बदल झाला आहे तो शिक्षण पद्धतीत. शिक्षण पद्धती पूर्वीसारखी राहिलेली नाही ती खूप बदलली आहे. शिक्षणाच्या सोयी मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. त्याच्या गुणवत्तेबद्दल नंतर विचार करू पण अगदी लहान लहान खेड्यांमध्येही महाविद्यालयं स्थापन झाली आहेत. अनेक मुलं शिकली, त्यांना अभ्यासक्रमातून काय मिळालं हा एक भाग महत्त्वाचा आहेच पण त्यांचा आत्मविश्वास वाढला ही बाब जास्त महत्त्वाची आहे.

शिक्षणाच्या प्रसारामुळे मुली शिकल्या.. त्यांची प्रगती झाली. पूर्वी मुलींना शहर गाठावं लागे, अनेकींना घरातून संमती मिळत नसे मग त्यांचं शिक्षण थांबत असे तशी परिस्थिती आता नाही. समाजाच्या एकंदरीत वातावरणात बदल करण्यासाठी या शिक्षणपद्धतीच्या रूपाने झाला.

Maharashtra@61 : जाणून घ्या काय म्हणत आहेत ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर ?

दुसरा बदल झाला तो सरकारच्या सहाय्याने कार्यक्षम शेतकऱ्यांच्या कार्यपद्धतीत झाला. या सगळ्या शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत ही वेगवेगळ्या सरकारच्या काळात वेगवेगळ्या सरकारांनी केली. पण एक अडचण अशी झाली की शेतीपेक्षा इतर किफायतशीर व्यवसाय मग ते बरे असोत किंवा वाईट पण ते शहरात लोकांना उपलब्ध झाले. त्यामुळे अनेक हुशार मंडळी खेड्यातली शेती तशीच ठेवून शहरांमध्ये आली. अशा तरूणांनी शेतीकडे दुर्लक्ष केलं. शहरात वेगवेगळ्या व्यवसायात किंवा राजकारणात पडल तर आपल्याला आणखी पुढे जाता येईल असं या तरूणांना मनातून वाटू लागलं. या विचारांपासून तरूणांना राजकीय नेते परावृत्त करू शकलेले नाहीत.

तिसरा बदल झाला दळणवळणाच्या साधनांमध्ये , पूर्वी मला आठवतंय तालुक्याच्या जागी जायचं तरीही रस्ते उपलब्ध नव्हते, वाहनं नव्हती. एखादी सरकारी बस जायची. आता हे चित्र बदललं रस्ते चांगले झाले, वाहनंही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाली. त्यामुळे खेड्यांमधली साधारण 25 टक्के लोकसंख्या खेडं सोडून शहरात येऊ लागली काही काम न करता पुन्हा गावाकडे परतू लागली हे चित्र निर्माण झालं त्याला एक नैतिक दडपण असणारं नेतृत्त्व हवं होतं. तसं आपल्याकडे आजवर झालेलं नाही असंही मत नरेंद्र चपळगावकर यांनी मांडलं.

Maharashtra@61 : इतक्या वर्षात महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलला -डॉ. अभय बंग

हे बदल जसे आहेत तसा आपल्याला आणखी एक बदल दिसतो की स्थानिक स्वराज्य संस्थांचा प्रयोग आपण केला. ज्यामुळे ग्राम पंचायती, जिल्हा परिषदा, पंचायत समिती निर्माण झाल्या त्यामध्ये ग्रामीण भागातला तरूण काम करू लागला. ज्याचा चांगला उपयोग झाला या सगळ्यामध्ये दोष काय आहेत ते आपल्या सगळ्यांनाच चांगले माहित आहेत. ते दोष मागे टाकून आपण पुढे जाणार आहोत का? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. दोष मागे टाकून पुढे जायचं असेल तर काही निर्णय कठोर होऊन घ्यावे लागतील. मतं मिळाली नाहीत तरीही चालेल पण जे समासाठी योग्य नाही ते मान्य करणार नाही असा विचार करणारी पिढी आपल्याला घडवावी लागेल. जातीपातीचे विचार, धर्मभेदाचे किंवा इतर जुनाट विचार मागे सोडून वाटचाल करावी लागणार आहे. समाजात कुठल्याही भिंती उभ्या करण्यापेक्षा महाराष्ट्र एकसंध कसा राहिल याचा विचार केला तर अनेक महत्त्वाचे बदल येत्या काळात घडतील अशी आशा मला महाराष्ट्र दिनी वाटते आहे असंही चपळगावकर यांनी सांगितलं.

    follow whatsapp