Satara Rain: निसर्ग कोपला… साताऱ्यात अतिवृष्टीमुळे आतापर्यंत तब्बल 14 जणांचा मृत्यू

इम्तियाज मुजावर

• 11:30 AM • 23 Jul 2021

सातारा: सातारा (Satara) जिल्ह्यात सद्य:स्थितीत पश्चिम भागात जोरदार अतिवृष्टी (Very Heavy Rainfall) होत आहे. जिल्ह्यातील सर्व धरणातून पाण्याचा विसर्ग नदी पात्रात होत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार सातारा जिल्ह्यात पुढील काही दिवस अतिवृष्टी होणार आहे. यातच आता अशी माहिती समोर आली आहे की, साताऱ्यातील आंबेघर येथील तब्बल 14 जणांचा दरड कोसळून मृत्यू (14 Death) झाल्याचं समोर […]

Mumbaitak
follow google news

सातारा: सातारा (Satara) जिल्ह्यात सद्य:स्थितीत पश्चिम भागात जोरदार अतिवृष्टी (Very Heavy Rainfall) होत आहे. जिल्ह्यातील सर्व धरणातून पाण्याचा विसर्ग नदी पात्रात होत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार सातारा जिल्ह्यात पुढील काही दिवस अतिवृष्टी होणार आहे. यातच आता अशी माहिती समोर आली आहे की, साताऱ्यातील आंबेघर येथील तब्बल 14 जणांचा दरड कोसळून मृत्यू (14 Death) झाल्याचं समोर आलं आहे.

हे वाचलं का?

सातारा जिल्ह्यात सध्या चालू असलेल्या अतिवृष्टीमुळे पाटण तालुक्यातील मिरगाव, आंबेघर, हुंबरळी, ढोकावळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्त हानी झालेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाल्याचं समजतं आहे.

तथापि, दरड कोसळल्यामुळे अद्यापही ढिगाऱ्याखाली काही जण अडकले असण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे अद्याप तरी मृतांचा निश्चित आकडा सांगता येणार नाही.

या ठिकाणी एनडीआरएफचे एक पथक आणि स्थानिक प्रशासन, नागरिकांच्यामार्फत युध्दपातळीवर शोध व बचावकार्य सुरु आहे.

जावळी तालुक्यातील रेंगडी गावामध्ये दोन व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने बेपत्ता आहेत तर दोन व्यक्ती मयत असल्याचं समजतं आहे.

तसेच वाई तालुक्यातील कोंढवळे येथे पाच घरं पूर्णपणे मातीच्या ढिगाऱ्यात दबली गेलेली असून सद्य:स्थितीत दोन व्यक्ती मयत आढळून आलेल्या आहेत. या ढिगाऱ्यात अडकलेल्या 27 नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. मौजे जोर याठिकाणी देखील दोन व्यक्तींचा मृत्यू झाल्याचं समजतं आहे.

महाबळेश्वर तालुक्यामध्ये 594.04 मि.मी इतका विक्रमी पाऊस झाल्यामुळे बऱ्याचशा गावाचा संपर्क तुटला असून मौजे धावरी या ठिकाणी एक व्यक्ती मयत झाली असल्याची माहिती मिळते आहे.

दरम्यान, पावसामुळे मोठ्या प्रमाणावर घरांचे व शेतीपिकांचे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झालेले आहे. जिल्ह्यात एक अतिरिक्त एनडीआरएफचे पथक आज सायंकाळपर्यंत दाखल होणार असून यामुळे जिल्ह्यात होणाऱ्या अतिवृष्टीमध्ये तात्काळ शोध व बचावकार्यास मदत होणार आहे.

अतिवृष्टीमुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनमार्फत करण्यात आले आहे.

  • कोणत्याही परिस्थितीत नागरिकांनी पुराच्या पाण्यात प्रवेश करु नये.

  • नदीपात्राच्या कडेला अथवा धोक्याच्या ठिकाणी वास्तव्यास असल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत व्हावे.

  • मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये.

  • जुन्या मोडकळीस आलेल्या घरात अथवा इमारतीत आश्रय घेऊ नये.

  • नदी, नाल्याच्या पुलावरुन पाणी वाहत असल्यास कोणत्याही परिस्थितीत पूल ओलांडू नये.

  • अफवांवर विश्वास ठेऊ नये आणि अफवा पसरवू नयेत.

  • असे आवाहनही प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

Koyna Dam: तुफान पाऊस… कोयना धरणाचे दरवाजे उघडले, 11 हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग

दरम्यान, साताऱ्याची नेमकी स्थिती काय आहे याबाबत राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी अशी माहिती दिली की, ‘साताऱ्यात आतापर्यंत आजवर अशा स्वरुपाचा पाऊस कधीही झाला नव्हता जेवढा मागील चार दिवसात झाला आहे. याच पावसामुळे डोंगर भागात मोठ्या प्रमाणात दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.’

‘एनडीआरएफची तुकडी इथे पोहचली आहे. पण आंबेघर इथे जी दरड कोसळली आहे तिथे जवळजवळ 8 फुटांहून अधिक मातीचे ढिगारे साचले आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी हाताने ढिगारे हटवणं शक्य नाही. इथे जवळजवळ 10 ते 12 घरं दबली गेली असल्याची देखील भीती व्यक्त केली जात आहे.’

‘दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाटण तालुक्याचा आढावा घेतला आहेत. त्यासंबंधी त्यांनी योग्य ते निर्देश दिले आहेत.’ अशी माहिती शंभूराजे देसाई यांनी दिली आहे.

    follow whatsapp