मुंबईतल्या माटुंगा स्टेशनवर पुद्दुचेरी एक्स्प्रेसचे तीन डबे घसरले, लोकल सेवा उशिराने

मुंबई तक

• 07:28 PM • 15 Apr 2022

मुंबईतल्या माटुंगा रेल्वे स्टेशनवर शुक्रवारी रात्री पुद्दुचेरी एक्स्प्रेस (११००५) चे तीन डबे घसरले. त्यामुळे रेल्वे वाहतूक व्यवस्था कोलमडली. मध्य रेल्वेने कल्याणच्या दिशेने प्रवास करणारे प्रवासी आणि मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारे प्रवासी या सगळ्यांनाच घरी पोहचण्यास किंवा इच्छित स्थळी पोहचण्यास विलंब लागत होता. या घटनेची सूचना मिळताच रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पोहचले. जीआरपी मुंबईच्या […]

Mumbaitak
follow google news

मुंबईतल्या माटुंगा रेल्वे स्टेशनवर शुक्रवारी रात्री पुद्दुचेरी एक्स्प्रेस (११००५) चे तीन डबे घसरले. त्यामुळे रेल्वे वाहतूक व्यवस्था कोलमडली. मध्य रेल्वेने कल्याणच्या दिशेने प्रवास करणारे प्रवासी आणि मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारे प्रवासी या सगळ्यांनाच घरी पोहचण्यास किंवा इच्छित स्थळी पोहचण्यास विलंब लागत होता.

हे वाचलं का?

या घटनेची सूचना मिळताच रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पोहचले. जीआरपी मुंबईच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती दिली की रेल्वे प्रशासनासोबत आम्ही ट्रेनमध्ये अडकलेल्या लोकांच्या सहकार्यासाठी व्यवस्था करत आहोत. ज्या प्रवाशांना मदत हवी असेल त्यांनी १५१२ हा क्रमांक डायल करावा असंही आवाहन करण्यात आलं आहे.

काय घडली घटना?

मुंबईतल्या माटुंगा स्टेशनजवळ रेल्वेचा अपघात झाला. दादर पुद्दुचेरी या एक्स्प्रेसचे शेवटचे तीन डबे घसरले. रात्री उशिरा ही घटना घडली. गडग एक्स्प्रेसच्या इंजिनने दादर पुद्दुचेरी एक्स्प्रेसला मागून धडक दिल्याने हा अपघात घडला. सुदैवान यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली. रात्रीच्या वेळी मुंबईतून अनेक एक्स्प्रेस सुटतात. मात्र अपघात झाल्याने त्या सेवांवर आणि लोकल सेवांवरही परिणाम झाला.

रेल्वेचे अधिकारी या ठिकाणी पोहचले आहेत तसंच रात्रभर काम करून तिन्ही डबे रूळावर आणण्यात येणार आहेत. त्यानंतर ही वाहतूक सुरळीत होईल अशी माहितीही देण्यात आली आहे. मुंबईच्या बाहेर जाणाऱ्या सुमारे सात एक्स्प्रेस गाड्यांवर या अपघाताचा परिणाम झाला आहे.

या अपघातानंतर फास्ट ट्रॅकवरच्या लोकल या स्लो ट्रॅकवर वळवण्यात आल्या. त्यामुळे स्लो ट्रॅकवर अतिरिक्त वाहतुकीचा बोजा पडला. त्यामुळेच मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली. अनेक प्रवाशांना इच्छित स्थळी जाण्यास एरवी अर्धा तास ते एक तास लागतो त्याऐवजी दीड तास लागत होता. M इंडिकेटर आणि फेसबुक पेजच्या माध्यमातून तसंच ट्विटरच्या माध्यमातूनही लोक आपण कुठे अडकून पडलो आहोत? पुढे ट्रेन जात नाही, ट्रेन कधी सुटेल या सगळ्या समस्या मांडत असल्याचं दिसलं.

एक्स्प्रेसमधल्या प्रवाशांना उरलेल्या कोचमध्ये हलवण्यात येणार असून पुढच्या स्टेशनवर या गाडीला एक्स्ट्रा तीन डबे जोडण्यात येणार आहे अशी माहिती मध्य रेल्वेचे पीआरओ शिवाजी सुतार यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

    follow whatsapp