अमरावतीमध्ये दंगल घडवण्यामागे भाजप असल्याचा आरोप आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. भाजपचे नेते अनिल बोंडे यांनी दंगलीचा कट रचला होता. दंगल भडकवण्यासाठी मुंबईतून पैसे पाठवण्यात आले होते असाही गंभीर आरोप नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत केला. भाजपकडची सगळी शस्त्र संपली की मग ते दंगलीचं शस्त्र बाहेर काढतात. तेच यावेळी करण्यात आलं.
ADVERTISEMENT
अशा प्रकाराचं राजकारण महाराष्ट्राची जनता कधीही स्वीकारणार नाही. भाजपने असं नकारात्मक राजकारण करू नये असा इशाराही नवाब मलिक यांनी दिला. भाजपने बंद पुकारला होता, त्याआडून दंगली भडकवण्याचं काम भाजपने सोयीस्करपणे केलं. मात्र पोलिसांनी हा कट उधळून लावला असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. अमरावती सोडून कुठेही काहीच घडलं नाही. अमरवातीत दोन समुदाय दंगल झाली नाही. भाजपचे नेते अनिल बोंडे यांनी २ तारखेच्या रात्री दंगलीचा कट रचण्यात आला. दारू वाटली गेली, पैसे वाटण्यात आले असाही आरोप नवाब मलिकांनी केला.
एवढंच नाही तर रझा अकादमीची यातली काय भूमिका आहे ते पोलीस तपासत आहेत. मात्र रझा अकादमीचे नेते आशिष शेलारांसोबत काय करत होते असा प्रश्नही नवाब मलिक यांनी विचारला आहे. दंगल प्रकरणी राष्ट्रवादीच्या मालेगावातील नगरसेवकावर गुन्हा दाखल केला असल्याचं सांगितलं जात आहे. ते काही खरं नाही. आमदार मुफ्ती यांनी 2014 ची निवडणूक राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढली होती. त्यांच्यासोबत आलेल्या नगरसेवकांनी राष्ट्रवादीच्या तिकीटीवर निवडणूक लढली होती. नंतर काँग्रसेसोबत राष्ट्रवादीची युती झाली. त्यामुळे मालेगाव मतदारसंघ काँग्रेसकडे गेल्याने मुफ्ती हे एमआयएमसोबत गेले. त्यांच्यासोबत इतर नगरसेवकही गेले. कागदपत्रावर ते राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत. पण प्रत्यक्षात ते एमआयएममध्ये आहेत. त्यापैकी एका नगरसेवकावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे तो राष्ट्रवादीचा नगरसेवक आहे हे म्हणणं योग्य नाही, असं मलिक म्हणाले.
त्रिपुरातील घटनेनंतर मुस्लिम समाजात नाराजी होती. त्यामुळे मुस्लिम संघटनांनी बंदचं आवाहन केलं होतं. त्याचे पडसाद उमटले होते. पोलिसांनी घटनेला नियंत्रित केलं. ज्या लोकांनी दगडफेक केली. पोलिसांवर दगडफेक केली. अशा सर्व लोकांविरोधात गुन्हे दाखल करून अटक सुरू केली आहे, असं त्यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT