Sharad Pawar : "मोदी दर आठवड्याला...", पवारांचं गंभीर विधान, आयोगाकडे बोट

मुंबई तक

02 May 2024 (अपडेटेड: 02 May 2024, 09:45 AM)

Sharad Pawar PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भटकती आत्मा या विधानाला शरद पवार यांनी पुन्हा एकदा उत्तर दिले.

शरद पवार ने भटकती आत्मा वाले तंज को लेकर पीएम मोदी पर पलटवार किया. (Photo: X)

Sharad Pawar and PM Modi

follow google news

Sharad Pawar on PM Narendra Modi : (दिपक सुर्यवंशी, कोल्हापूर) पुण्यातील सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांचे नाव न घेता त्यांच्या टीका केली होती. भटकती आत्मा असा उल्लेख करत मोदींनी केलेल्या टीकेला शरद पवारांनी कोल्हापुरात उत्तर दिले. (Sharad Pawar Hits back To PM Modi after his remarks wandering soul)

हे वाचलं का?

कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या शरद पवारांची पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणूक आणि इतर मुद्द्यांवर भूमिका मांडली. देशातील परिस्थिती बदलल्याचेही पवार म्हणाले.  "आजकालचा बदल असा दिसतो की, शेतकरी मोदी सरकारवर अत्यंत नाराज आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मोदी सरकारबद्दल तरुण पिढीत जो विश्वास होता, तो आता कमी झाला आहे. आमच्या दौऱ्यात तरुण मोठ्या संख्येने सहभागी होत आहे. पहिले दोन टप्पे झालेत. उर्वरित टप्प्यातही महाराष्ट्रातील चित्र बदलेलं असं दिसतंय", असे मत पवारांनी मांडले. 

महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान का? पवारांनी उपस्थित केली शंका

महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणूक होत आहे. यावरून पवारांनी आयोगाच्या वेळापत्रकाबद्दल गंभीर आरोप केला. ते म्हणाले, "आमची त्याबद्दल तक्रार आहे. तक्रार अशी आहे की, तामिळनाडूमध्ये ४२ जागा आहेत, तिथे एका दिवसात निवडणूक. उत्तर प्रदेश ही पाच दिवस-सहा दिवसांत निवडणूक घेतली नाही. असं असताना महाराष्ट्रात पाच टप्प्यात घ्यायचं कारण काय? तामिळनाडू, मध्य प्रदेश एका टप्प्यात घेऊ शकता, तर महाराष्ट्रात पाच टप्पे का? याचा अर्थ स्पष्ट हा दिसतो... एक राज्यकर्त्यांना चिंता आहे. त्यामुळे पंतप्रधान पुन्हा पुन्हा राज्यात कसे जातील, याची काळजी घेण्यासाठी हे वेळापत्रक बघायला मिळते."

हेही वाचा >> '400 पार म्हणजे धोक्याची घंटा', संभाजीराजेंनी काय दिला मेसेज?

"आपण बघतोय, मोदी दर आठवड्याला कुठे न कुठे असतात. मला वाटतं कोल्हापुरला येऊन गेले. कराडला येऊन गेले, माळशिरसला येऊन गेले. सोलापुरात येऊन गेले. अनेक ठिकाणी त्यांचे दौरे सुरू आहेत. अधिक ठिकाणी जायला संधी मिळावी म्हणून महाराष्ट्रातील निवडणूक पाच टप्प्यामध्ये जाणीवपूर्वक घेतलेली दिसते", असा गंभीर आरोप पवारांनी केला.

अचानक वाढलेल्या टक्केवारी बद्दल तक्रार

निवडणूक आय़ोगाने उशिराने मतदानाची टक्केवारी जाहीर केल्याने शंका उपस्थित होत आहे. देशभरात याची चर्चा होत आहे. या मुद्द्यावर बोलताना पवार म्हणाले, "काळजी करण्यासारखी स्थिती आहे. उदाहरणार्थ गडचिरोली. सर्वात जास्त मतदान आहे. आदिवासी, काही भाग दुर्गम आहे, असे असताना सुद्धा चंद्रपूर आणि नागपूरपेक्षा गडचिरोलीची टक्केवारी जास्त आहे. त्याची माहिती घ्यावी लागले. नागपूरला ५० च्या आत आहे."

हेही वाचा >> निकालाआधीच काँग्रेसने गमावल्या दोन जागा, महाराष्ट्रात थोडक्यात वाचली!

"नागपूर उपराजधानी आहे. सुशिक्षित वर्गाची टक्केवारी जास्त आहे. तिथे नितीन गडकरींसारखे उमेदवार असूनही ५० च्या आत मतदान होतं, याचा अर्थ एकतर लोक उदासीन असतील. आम्हा लोकांच्या कामाबद्दल अस्वस्थता किंवा नाराजी असेल किंवा हवामान हाही मुद्दा. विशेषतः विदर्भात टाळता येणार नाही", असे पवार म्हणाले. 

'भटकती आत्मा', मोदींना पवारांचे उत्तर 

शरद पवारांनी केलेल्या भटकती आत्मा या टीकेबद्दल प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा पवार हसले. ते म्हणाले की, "त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हा आत्मा अस्वस्थ आहे, हे खरं आहे. कारण या आत्म्याने... मी लहान होतो. पण, जवाहरलाल नेहरू सुद्धा लांबून पाहिलेत. इंदिरा गांधी जवळून पाहिल्यात. इंदिरा गांधींपासून आतापर्यंतच्या पंतप्रधानांपर्यंत प्रत्येक पंतप्रधानांशी कुठे न कुठे भेटण्याचा, बोलण्याची संधी मिळाली. त्यांची भाषणं ऐकायची संधी मिळाली, पण पंतप्रधान पदाची अप्रतिष्ठा जे आता करताहेत, ती यापूर्वी कधीही झाली नाही."

"ते आम्हा लोकांवर जे वक्तव्य करतात, याला काही अर्थ नाही. ते काहीही बोलू शकतात. एके ठिकाणी कुणाचं तरी बोट धरून मी राजकारणात आलो, असेही म्हणले. दुसरीकडे आपण अस्वस्थ आत्मा हेही तुम्ही ऐकलेलं आहे", असे पवार म्हणाले.

    follow whatsapp