मुंबईतल्या गोविंदाची झुंज संपली! केईएममध्ये उपचार घेत असलेल्या प्रथमेश सावंतचं निधन

मुंबई तक

• 10:16 AM • 08 Oct 2022

दहींहंडीचे थर लावताना जखमी झालेल्या प्रथमेश सावंत या 20 वर्षांच्या गोविंदाचा अखेर दुर्दैवी मृत्यू झाला आहे. केईएम रुग्णालयात या गोविंदावर गेल्या अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते. अखेर मुंबईतील या गोविंदाची झुंज संपली आहे. केईएम रुग्णालयात त्याने अखेरचा श्वास घेतला. उपचारादरम्यान त्याला न्युमोनिया झाला. त्याच दरम्यान आज सकाळी त्याला कार्डिएक अरेस्ट आल्याने त्याचा मृत्यू झाला.त्याच्या मृत्यूने […]

Mumbaitak
follow google news

दहींहंडीचे थर लावताना जखमी झालेल्या प्रथमेश सावंत या 20 वर्षांच्या गोविंदाचा अखेर दुर्दैवी मृत्यू झाला आहे. केईएम रुग्णालयात या गोविंदावर गेल्या अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते. अखेर मुंबईतील या गोविंदाची झुंज संपली आहे. केईएम रुग्णालयात त्याने अखेरचा श्वास घेतला. उपचारादरम्यान त्याला न्युमोनिया झाला. त्याच दरम्यान आज सकाळी त्याला कार्डिएक अरेस्ट आल्याने त्याचा मृत्यू झाला.त्याच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे वाचलं का?

नेमकं काय झालं होतं?

दहीहंडी फोडताना गोविंदाच्या थरावरून कोसळल्याने प्रथमेशला गंभीर दुखापत झाली होती. त्याच्या पाठिचा कणा फ्रॅक्चर झाला होता. त्यामुळे शरीराची हालचाल आणि संवेदना बंद झाली होती. प्रथमेशवर केईएम रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मुख्यमंत्री कार्यालयाने त्याच्या उपचारासाठी 5 लाखांची मदत केली होती. प्रथमेश लहान असताना त्याच्या आईचे कॅन्सरमुळे निधन झाले होते. नंतर वडील आणि बहिणीचं एका आजारामुळं निधन झालं. आई-वडील नसलेला प्रथमेश चुलत्यांकडे राहत होता. आयटीआयचे शिक्षण घेताना डिलिव्हरी बॉय म्हणून काम करायचा.

नाना पटोलेंनी उपस्थित केला सवाल

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रथमेशला श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले, मुंबईतील दहिहंडी उत्सवात 20 वर्षीय जखमी गोविंदा प्रथमेश सावंतचे उपचारादरम्यान निधन झाले, ही घटना हृदय पिळवटणारी आहे. प्रथमेशला भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबियांच्या प्रति संवेदना व्यक्त करतो. सण उत्सवांना भावनिक आणि धार्मिक वळण देणारे राजकारणी याची जबाबदारी घेणार का? असा सवाल नाना पाटोले यांनी उपस्थित केला आहे.

यंदा निर्बंधमुक्त उत्सव

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या महामारीमुळे अनेक सणांवर निर्बंध होते. मात्र, यंदाच्यावर्षी मोठ्या उत्साहात आणि निर्बंधमुक्त सण साजरे करता येणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते. त्यामुळे यंदा गोकुळाष्ठमीनिमित्त राज्यभर मोठ्या उत्साहात दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. अनेक राजकीय मंडळींनी मोठ्या धुमधडाक्यात दहीहंडीचे आयोजन केल्याचं पाहायला मिळालं. मात्र, संदेशच्या आणि प्रथमेशच्या निधनाने दहीहंडीला गालबोट लागले आहे.

याआधी सातव्या थरावरून पडलेल्या संदेशचाही झाला होता मृत्यू

याआधी थरावरून कोसळलेल्या संदेश दळवी या तरुणाचे उपचारादरम्यान निधन झालं होतं. विलेपार्ले पूर्व बाबरवाडा विमानतळ येथे दहीहंडी फोडत असताना संदेश सातव्या थरावरुन खाली कोसळला. मुंबईतील नानावटी रुग्णालयात दोन दिवस तो दाखल होता. 7व्या थरावरुन खाली कोसळल्यामुळे त्याच्या मानेला आणि मेंदूला जबर दुखापत झाली होती. अखेर त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. संदेश आपल्या आई-वडील आणि भावंडांसह कुर्ल्याला राहत होता. अवघ्या 22 वर्षात त्याचं निधन झाल्याने त्याच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून त्याच्या कुटुंबियांना सहायता निधीतून 10 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला होता. स्वतः आमदार दिलीप लांडेंनी कुटुंबियांना घरी जाऊन धनादेश सुपूर्द केला होता.

    follow whatsapp