प्रविण दरेकर म्हणाले, “दाऊदचा राजीनामा घेण्यासाठी जमलात, त्याबद्दल आभार”

मुंबई तक

• 08:56 AM • 09 Mar 2022

जमीन व्यवहार प्रकरणात आरोप झाल्यानंतर मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीने नवाब मलिक यांना अटक करण्यात आलं. मलिक सध्या न्यायालयीन कोठडीत असून, अटकेपासूनच भाजपकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. याच मागणीसाठी भाजपच्यावतीने आज मोर्चा काढण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात भाजपच्या नेत्यांनी भाषणे केली. यावेळी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांचंही भाषणं झालं, पण भाषणाच्या शेवटी दरेकर मूळ मागणीच […]

Mumbaitak
follow google news

जमीन व्यवहार प्रकरणात आरोप झाल्यानंतर मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीने नवाब मलिक यांना अटक करण्यात आलं. मलिक सध्या न्यायालयीन कोठडीत असून, अटकेपासूनच भाजपकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. याच मागणीसाठी भाजपच्यावतीने आज मोर्चा काढण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात भाजपच्या नेत्यांनी भाषणे केली. यावेळी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांचंही भाषणं झालं, पण भाषणाच्या शेवटी दरेकर मूळ मागणीच विसरून गेले.

हे वाचलं का?

नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात बोलताना प्रविण दरेकर म्हणाले,”मला ठाकरे सरकारची लाज वाटतेय. ज्यांच्याकडे आम्ही आदराने बघतो, त्यांच्या बाळासाहेबांच्या सुपूत्रांना विचारु इच्छितो की, तुमचा ठाकरी बाणा कुठे गेला. ज्या दाऊदच्या सहकाऱ्याने बॉम्बस्फोट केला. त्या बॉम्बस्फोटातील आरोपींची जागा नवाव मलिक खरेदी करतात. तो देशविरोधी कटात असल्याचं सिद्ध होतं. न्यायालयाच्या आदेशाने तो तुरूंगात आहे”, असं त्यांनी सांगितलं.

“नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी विधानसभा आणि विधान परिषदेत आकांडतांडव केलं. सरकार निर्लज्जपणे सांगतंय की आम्ही नवाब मलिकांचा राजीनामा घेणार नाही. सरकारची मस्ती चालणार नाही. राजीनामा घेण्यासाठी इथे लाखोंचा जनसागर लोटला आहे.”

“महात्मा गांधींनी आयुष्यभर अहिंसेचा पुरस्कार केला. त्यांच्या पुतळ्यासमोर अख्खं सरकार देशद्रोह्याला पाठिशी घालण्यासाठी बसतं. लाजा पण वाटत नाही. उपमुख्यमंत्री बसतात. गृहमंत्री बसतात. आमचे महात्मा गांधी असते, तर शिक्षा दिली असती”, अशी टीका त्यांनी केली.

“केंद्रीय यंत्रणांवरून देवेंद्रजी आणि भाजपवर आरोप करतात, पण काल फडणवीसांनी तुमचे कपडे उतरवलेत. देवेंद्रजींना संपवण्याचा कट करत आहेत. तुमचं षडयंत्र व्हिडीओ क्लिपच्या माध्यमातून उघडं पाडलं. विधिमंडळाच्या सभागृहात पुराव्यासहित तुमचे कपडे काढले.”

“तुम्ही देवेंद्र फडणवीसांना संपवू शकत नाही, पण अशा देशद्रोही प्रवृती देवेंद्रजी आणि भाजप संपवेल. सत्तेला लाथ मारून उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचा कित्ता गिरवावा, असं आवाहन करतो. शरद पवार असो की, उद्धव ठाकरे. जनतेच्या संतापाने हे सरकार खाली आल्याशिवाय राहणार नाही.”

“आपण लाखोच्या संख्येनं रोष व्यक्त करण्यासाठी आणि दाऊदचा राजीनामा मागण्यासाठी जमलात त्याबद्दल आभार व्यक्त करतो,” असं प्रविण दरेकर म्हणाले.

    follow whatsapp