मुंबई : कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शिवसेना खासदार संजय राऊत यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. पीएमएलए कोर्टाने या संदर्भातला निर्णय दिला आहे. तसंच ईडीची स्थगिती मागणीही न्यायालयानं फेटाळून लावली. त्यामुळे आता जवळपास १०० दिवसांनी राऊत तुरुंगातून बाहेर येणार, हे स्पष्ट झालं आहे.
ADVERTISEMENT
दरम्यान, राऊतांच्या जामीनाची बातमी बाहेर येताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाविकास आघाडीच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. शिवाय राऊत आणि त्यांचे कुटुंबीय देखील आनंदीत आहेत, असं संजय राऊत यांचे भाऊ आणि आमदार सुनिल राऊत यांनी सांगितलं. तसंच जामीनाचा आदेश ऐकताच स्वतः संजय राऊत यांच्याही डोळ्यात आनंदाश्रू होते, असंही सुनिल राऊत यांनी सांगितलं.
काय म्हणाले सुनिल राऊत?
संजय राऊत हे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे प्रामाणिक भक्त होते, आणि आम्ही आजही असं मानतो की बाळासाहेब आमच्यासोबत आहेत. त्यांचे आणि महाराष्ट्रातील जनतेचे आशीर्वाद, न्यायालयावर आमचा असलेला विश्वास या कारणास्तव आज त्यांना जामीन मिळाला आहे.
जेव्हा संजय राऊत आणि कुटुंबियांनी बेल ऑर्डर ऐकली तेव्हा सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. तसंच सगळ्यांच्या तोंडी सत्यमेव जयते, टायगर इज कमबॅक हे वाक्य होते. सोबतच यावेळी टाळ्यांचा कडकडाटही झाला. एकूणचं कोर्टामध्ये संजय राऊतांसह त्यांच्या घरच्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण पसरलं होतं.
संजय राऊत जेलमध्ये गेल्यानंतर शिवसेनेमध्ये अंधेरीची पोटनिवडणूक, मंत्रिमंडळाचा विस्तार, दसरा मेळावा अशा अनेक गोष्टी घडल्या. आता या सगळ्या नंतर संजय राऊत यांचं बाहेर येणं महत्त्वाचं मानलं जातं आहे. संजय राऊत आता पहिल्यासारखेच धडाडणार की काही दिवस शांत राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT