यंदाची आषाढी वारी निर्बंधात? वारी काळात पंढरपूरमध्ये संचारबंदीचा पोलीस अधिक्षकांचा शासनाला प्रस्ताव

मुंबई तक

• 02:02 PM • 22 Jun 2021

कोरोनाच्या सावटामुळे सलग दुसऱ्या वर्षी महाराष्ट्रातील तमाम वारकरी पंथाला आपल्या लाडक्या विठुरायाचं दर्शन घेता येणार नाहीये. शासनाने पायी वारीला बंदी घातली असून पालखी सोहळ्यासाठीही वारकऱ्यांची मर्यादा ठरवून देत निर्बंध घातले आहेत. याचसोबत आषाढी एकादशी काळात पंढरपूर आणि परिसरातील १० गावांमध्ये संचारबंदी लागू करण्याचा प्रस्ताव पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी शासनाला दिला आहे. शासनदरबारी हा प्रस्ताव […]

Mumbaitak
follow google news

कोरोनाच्या सावटामुळे सलग दुसऱ्या वर्षी महाराष्ट्रातील तमाम वारकरी पंथाला आपल्या लाडक्या विठुरायाचं दर्शन घेता येणार नाहीये. शासनाने पायी वारीला बंदी घातली असून पालखी सोहळ्यासाठीही वारकऱ्यांची मर्यादा ठरवून देत निर्बंध घातले आहेत. याचसोबत आषाढी एकादशी काळात पंढरपूर आणि परिसरातील १० गावांमध्ये संचारबंदी लागू करण्याचा प्रस्ताव पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी शासनाला दिला आहे.

हे वाचलं का?

शासनदरबारी हा प्रस्ताव प्रलंबित असून लवकरच यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. या काळात चंद्रभागा परिसरात कलम १४४ लागू करण्यात येणार असून सोलापूर जिल्ह्यातही या काळात त्रिस्तरीय नाकाबंदी लावण्यात येणार आहे. परवानगी नसलेल्या एकाही भाविकाला या काळात सोलापूर जिल्ह्यात प्रवेश मिळणार नाहीये.

काही दिवसांपूर्वी पुण्यात अजित पवारांनी पालखी सोहळ्याचे नियम जाहीर केले. देहू आणि आळंदी येथून सुरु होणाऱ्या पालखी प्रस्थान सोहळ्याला १०० तर इतर ८ पालखी प्रस्थान सोहळ्याला ५० जणांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. प्रत्येक पालखीला यंदाही दोन बस देण्यात येणार असून सर्व नियमांचं पालन करुनच यंदाचा सोहळा आयोजित होईल असं अजित पवारांनी सांगितलं.

असा असेल यंदाचा पालखी सोहळा –

  • पालखी यंदाही बसमधूनच पंढरपूरला जाणार, ज्यासाठी शासन लवकरच अधिकृत आदेश जाहीर करेल

  • इतर वारकरी दर्शनासाठी येऊ शकणार नाहीत

  • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सहभागी वारकऱ्यांना वैद्यकीय तपासणी बंधनकारक

  • काला आणि रिंगण सोहळ्याला यंदा परवानगी नाही

  • रथोत्सवासाठी यंदा फक्त १५ वारकऱ्यांना परवानगी

  • प्रत्येक पालखीसोबत फक्त ४० वारकरी असतील

मानाच्या पालखी सोहळ्याचं आगमन हे दशमीला पंढरपुरात होईल. वाखरीजवळ वाहनं पोहचल्यानंतर पुढील दीड किलोमिटरचं अंतर प्रतिकात्मक स्वरुपात पायी गाठण्याची परवानगी पालख्यांना देण्यात आली आहे. पंढरपूरचं मंदीर यावेळी दर्शनासाठी खुलं करण्यात येणार नाही असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं.

“आषाढीच्या पायी वारीसाठी वारकरी संप्रदायानं मागणी केली होती. वारकरी संप्रदायातील अनेक मान्यवरांसोबत आमची बैठक पार पडली. परंतू कोरोनामुळे सध्याची परिस्थिती पाहता मंत्रीमंडळ बैठकीत फक्त १० प्रमुख पालख्यांना परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला”, अशी माहिती अजित पवारांनी दिली.

असा असेल दहा मानाच्या पालख्यांना क्रम –

१) संत निवृत्ती महाराज (त्रंबकेश्वर)

२) संत ज्ञानेश्वर महाराज (आळंदी)

३) संत सोपान काका महाराज (सासवड)

४) संत मुक्ताबाई (मुक्ताईनगर)

५) संत तुकाराम महाराज (देहू)

६) संत नामदेव महाराज (पंढरपूर)

७) संत एकनाथ महाराज (पैठण)

८) रुक्मिणी माता (कौडानेपूर-अमरावती)

९) संत निळोबाराय (पिंपळनेर – पारनेर अहमदनगर)

१०) संत चांगटेश्वर (सासवड)

    follow whatsapp