समाजाचं मनोरंजनीकरण झालं असताना समाज एका दिशेला जात असताना माध्यमांनी मधे उभं राहून समाजाला दुसरी दिशा दाखवली पाहिजे. समाजाला वैचारिकतेकडे नेणं ही माध्यमांची जबाबदारी आहे असं वक्तव्य ज्येष्ठ पत्रकार आणि लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी केलं आहे. ९४ व्या अखिल भारतीय संमेलनात माध्यमांचं मनोरंजनीकरण या विषयावरच्या परिसंवादात गिरीश कुबेर यांनी हे मत व्यक्त केलं आहे. आजच ते या परिसंवादासाठी आले असताना संभाजी ब्रिगेडच्या दोन कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शाईफेक केली. तरीही त्यांनी परिसंवादात उपस्थित राहून आपली परखड मतं आणि विचार मांडले.
ADVERTISEMENT
काय म्हणाले गिरीश कुबेर?
‘माध्यमं हा समाजाचा घटक असतो, त्यामुळे माध्यमांचं मनोरंजीकरण झालं म्हणजे समाजाचं मनोरंजनीकरण झालं. समाजात वैचारिकतेचा अभाव असेल तर माध्यमांमध्येही तो तसाच दिसेल. त्याचवेळी माध्यमांची ही खरी जबाबदारी असते की अशा समाजाला वैचारिकतेकडे नेणं. माधम्यांमध्ये का यायचं याबाबत माझे संपादक गोविंद तळवलकर यांनी भूमिका सांगून ठेवली होती. तसं करण्याचीच माझी आस होती. समाज जर एका दिशेला जात असेल तर माध्यमांनी मधे उभं राहून दुसरी दिशा दाखवली पाहिजे. आता उलटं झालं आहे, समाज एका दिशेने जात असेल तर माध्यमं देखील त्याच दिशेने जातात. माध्यमं आधी पुढे पळतात की समाज पुढे पळतो अशा प्रकारचं सध्या चित्र आहे. हा माध्यमांचा खऱ्या अर्थाने पराभव आहे’
सध्या जे होतंय ते माध्यमांनी स्वतःची जबाबदारी टाकणं आहे. ही जबाबदारी माध्यमांनी सामूहिकपणे सोडून दिली आहे की काय असा प्रश्न पडण्यासारखी परिस्थिती आहे. माध्यमं जर लोकांना चांगलं वाचायला आवडत नाही असं म्हणत असेल तर याच्या इतका मोठा माध्यमांनी स्वतःच स्वतः केलेला पराभव दुसरा असू शकत नाही. लोकांना चांगलं वाचायला आवडत नसेल तर याचा साधा अर्थ असा आहे की लोकांना चांगलं वाचायला देता येईल अशी क्षमता त्या माध्यमांमधील लोकांमध्ये नाही. ती क्षमता आम्ही गमावून बसलो आहे. पुढील समाजाच्या प्रगतीसाठी हा मोठा धोका आहे असंही गिरीश कुबेर यांनी म्हटलं आहे.
भारताचा जगाचा किंवा इतिहासाचा टप्पा काढून पाहिला तर प्रत्येक महत्त्वाच्या घटनेला आकार देण्याचं किंवा घटना घडवण्यामागील प्रेरणा देण्याचं काम माध्यमांनी दिलीय. माध्यमांनी त्या काळाला आकार द्यायचा असतो. काळाला घडवणं, किमान तसा प्रयत्न करणं हा त्या माध्यमांच्या जबाबदारीचा भाग असतो. ती जबाबदारी आम्ही सोडून देतोय असं दुर्दैवाने म्हणावं लागेल. कारण मग माध्यमांचं काम काय? असाही प्रश्न यावेळी गिरीश कुबेर यांनी उपस्थित केला.
ADVERTISEMENT