चिपळूण : सध्या नव्या नवलाईचे नऊ दिवस आहेत. शिंदे गटाला भविष्यात भाजपसोबतच संघर्ष करावा लागेल, आमच्याबरोबर संघर्ष करण्यासाठी भाजप त्यांचं अस्तित्व शिल्लक ठेवणार नाही, असा इशारा शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी दिला. ते आज चिपळूणमध्ये बोलत होते.
ADVERTISEMENT
भास्कर जाधव म्हणाले, आता जरी कोणाला गुदगुदल्या होत असतील, तरी भाजपचं एकंदरीत वर्तन, धोरण, भूमिका बघाव्यात. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची वक्तव्यं शिंदे गटानं पुन्हा पुन्हा नजरेसमोर आणावीत. त्यामुळे भविष्यात भाजपचं शिंदे गटाचं अस्तित्वात ठेवेल की नाही? हा प्रश्न आहे. त्यामुळे अस्तित्वात राहण्याकरिता त्यांना भाजप बरोबरचं संघर्ष करावा लागणार आहे. त्यानंतर आमच्यासोबत संघर्ष करण्याची ताकद शिंदे गटात राहणार नाही, असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.
समता पार्टीच्या दाव्यावर भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया :
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या गटाला मिळालेलं मशाल चिन्ह सध्या वादात सापडलं आहे. या चिन्हावरून समता पक्षानं केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. हे चिन्ह समता पक्षाचं असल्याचा दावा करण्यात आला आहे. यावर प्रतिक्रिया देताना भास्कर जाधव यांनी निवडणूक आयोगाच्या कोर्टात चेंडू टोलावला.
आमदार जाधव म्हणाले, आम्हाला मिळालेलं चिन्ह भारतीय निवडणूक आयोगानं दिलं आहे. या चिन्हावर कोणाचा अधिकार आहे, चिन्ह कोणाकडे आहे या सगळ्याची खात्री करूनच त्यांनी हे चिन्ह आम्हाला दिलेलं असणार. आता जर कोणी या चिन्हावर दावा करत असेल तर त्याबाबत निवडणूक आयोग काय तो निर्णय घेईल. आम्हाला देण्यात आलेली निशाणी ही आयोगाने दिली आहे, त्यामुळे आज ती टिकविण्याचं काम निवडणूक आयोगाचंच आहे.
निखाऱ्यावरून चालताना चटके हे बसणारच :
निखाऱ्यावरून चालताना चटके हे बसणारच अशी प्रतिक्रिया ठाण्यातील सभेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर भास्कर जाधव यांनी दिली. आपण कोणते चितावणीखोर वक्तव्य केलं? आमची भाषणं तपासून बघितल्याशिवाय कोणीतरी तक्रार दिली म्हणून पोलिसांनी हे गुन्हे दाखल केले आहेत. असे गुन्हे जरी दाखल झाले तरी त्यांच्या विरोधातला असंतोष थांबविता येणार नाही असंही ते म्हणाले.
ADVERTISEMENT