२१ जून २०२२ ला शिवसेनेत सर्वात मोठं बंड झालं. एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी शिवसेनेच्या नेतृत्वाविरोधात अर्थात उद्धव ठाकरेंच्या विरोधात हे बंड पुकारलं आहे. शिवसेनेला बंडाळी होणं हे काही नवं नाही. मात्र एकनाथ शिंदे यांचं बंड सर्वार्थाने वेगळं ठरलं कारण शिवसेना सत्तेत असताना हे बंड झालं. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं. ३० जूनला एकनाथ शिंदे हे भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले.
ADVERTISEMENT
शिवसैनिक आणि एकनाथ शिंदे समर्थकांमध्ये राडा; शाखेतून काढलेले फोटो लावलेच!
एकनाथ शिंदे शिवसेना ताब्यात घेण्याच्या तयारीत
एकनाथ शिंदे एवढंच करून थांबलेले नाहीत. शिवसेना ताब्यात घेण्याची त्यांची तयारी सुरू आहे असंच दिसतं आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे लोकसभेतले १२ खासदारही शिंदे गटासोबत आले आहेत. तसंच कल्याण डोंबिवली, नवी मुंबई आणि ठाणे इथल्या माजी नगरसेवकांनीही शिंदे गटात जाणं पसंत केलं आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरेंचा विचार पुढे घेऊन जात आहोत त्यामुळे आम्हीच खरी शिवसेना आहोत हा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. आता तर त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत जे यश मिळालं त्याबाबत उमेदवारांचं अभिनंदन करत असताना उद्धव ठाकरेंचा गट असा उल्लेख केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.
काय आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं ट्विट?
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत युती सरकारला जनतेचा कौल. शिवसेना भाजप युतीच्या सर्व विजयी उमेदवारांचं अभिनंदन. तसंच निवडणुकीत मेहनत घेतलेल्या शिवसेना-भाजप युतीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे आणि मतदार राजाचे अभिनंदन आणि आभार.
राज्यातील २७१ ग्रामपंचायतींचे निकाल
भाजप-८२
शिवसेना-४०
उद्धव ठाकरे गट-२७
राष्ट्रवादी काँग्रेस-५३
काँग्रेस-२२
इतर-४७
अशी आकडेवारीही एकनाथ शिंदे यांनी या ट्विटमध्ये नमूद केली आहे. यामध्ये लक्षवेधी बाब ही ठरली आहे की त्यांनी आपला उल्लेख ‘शिवसेना’ असा केला आहे. तर ‘उद्धव ठाकरेंचा गट’ असं म्हटलं आहे. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी जे बंड पुकारलं तेव्हापासून शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट पडले आहेत. विशेष बाब म्हणजे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन करताना जे कार्ड ट्विट केलं आहे त्यावर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचेच फोटो आहेत.
आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन जात आहोत, असं एकनाथ शिंदे यांनी वारंवार म्हटलं आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दुभंगलेली शिवसेना पुन्हा कशी बांधता येईल यासाठी रणनीती आखत आहेत. अशात आता ग्रामपंचायतींचे निकाल लागलेले असताना आम्हीच खरी शिवसेना हा दावा एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा केला आहे. यावर उद्धव ठाकरे काही उत्तर देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT