मथुरा: उत्तर प्रदेशच्या मथुरेत आज (6 डिसेंबर) सकाळी जेव्हा रहिवाशांना जाग आली तेव्हा त्यांना त्यांचे शहर हे एक छावणी तर नाही ना असं वाटू लागलं. विशेषतः कृष्णजन्मभूमी मंदिराजवळील भाग. कारण राज्य सरकारच्या आदेशानुसार स्थानिक प्रशासनाने कटरा केशव देव परिसरात त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था केली आहे. कारण याच भागात असणाऱ्या मथुरा शाही इदगाह मशिदीबाबत आता वाद निर्माण झाला आहे.
ADVERTISEMENT
ही सुरक्षा यासाठी देखील अभूतपूर्व आहे की, अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादानंतरही मथुरेत कधी वाद निर्माण झाला नव्हता. पण यावेळी काही उजव्या विचारसरणीच्या संघटनांकडून धमक्या देण्यात आल्या आहेत की, ते हिंदू रितीरिवाजांनुसार मशिदीच्या आत पूजा करणार आहेत. त्यामुळेच आता या परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
शहराला जोडणाऱ्या प्रत्येक राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर पोलिसांनी बॅरिकेड्स लावले आहेत. मंदिर-मशिदीच्या मागून जाणारा रेल्वे मार्गही बंद करण्यात आला आहे. मथुरा वृंदावनला येणाऱ्या दोन गाड्याही यार्डातच थांबतील. तसेच इथे कलम 144 लागू करण्यात आले असून लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे. मंदिर किंवा मशिदीत जाणाऱ्या लोकांकडे त्यांची ओळखपत्रे मागितली जात आहेत. सीसीटीव्ही आणि ड्रोनच्या माध्यमातूनही पाळत ठेवली जात आहे.
अखिल भारत हिंदू महासभा, श्री कृष्ण जन्मभूमी निर्माण न्यास, नारायणी सेना आणि श्री कृष्ण मुक्ती दल या चार उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी डिसेंबरच्या सुरुवातीला लड्डू गोपाळाची मूर्ती विधी म्हणून स्थापित करण्याची परवानगी मागितली होती. त्यामुळे परिस्थिती आणखी बिघडण्याचा धोका वाढला आहे. ज्या ठिकाणी मशीद आहे, त्याच ठिकाणी श्रीकृष्णाचा जन्म झाला असा हिंदू संघटनांचा दावा आहे.
मथुराचे एसएसपी गौरव ग्रोवर यांनी ‘आज तक’ला सांगितले की, शहरात शांतता राखण्यासाठी पोलीस जादा काम करत आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस आणि निमलष्करी दल तैनात आहेत. आम्ही दोन्ही बाजूंच्या ज्येष्ठ व्यक्ती आणि धर्मगुरुंशी चर्चा केली आहे. जो कोणी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचे धोरण अवलंबण्याचे आदेश आहेत.
पोलिसांनी खबरदारी म्हणून हिंदू महासभेच्या जिल्हाध्यक्ष छाया वर्मा आणि नेते ऋषी भारद्वाज यांना 4 डिसेंबर रोजी अटक केली होती. हिंदू महासभेच्या अध्यक्षा राजश्री चौधरी यांनी दावा केला आहे की, त्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांची नात आहे. 6 डिसेंबरला मशिदीकडे निघणारी पदयात्रा आणि जलाभिषेकाचा कार्यक्रम कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. पूजेचा हक्क कोणी हिरावून घेऊ शकत नाही. असंही ते म्हणाले.
त्याचवेळी नारायणी सेनेनेही आपल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवल्याचा आरोप केला आहे. संघटनेचे नेते मनीष यादव यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सोडले नाही तर लखनऊमध्ये उपोषणाला बसू, अशी धमकीही दिली आहे.
कृष्णजन्मभूमी मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश मणी त्रिपाठी यांनाही सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट शेअर केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. कृष्णजन्मभूमी न्यासचे देव मुरारी यांच्यावरही अनेक गुन्हे दाखल आहेत. 12 ऑक्टोबर 1988 रोजी इदगाह मशिदीचे ट्रस्ट आणि श्री कृष्ण जन्मस्थान सेवा संघ यांच्यात झालेल्या करारावर हिंदू संघटनांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या ‘मथुरा की बारी है…’ या ट्विटमुळे तणाव वाढला आहे. त्यामुळे मुस्लिम समाजातील लोक नाराज झाले आहेत. त्यांनी ‘जलाभिषेक’ला परवानगी देऊ नये, असे आवाहन प्रशासनाला केले आहे. असे झाल्यास संपूर्ण ब्रजमध्ये तणाव वाढू शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे.
मात्र, पोलिस आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी असे काहीही होणार नाही, असे आश्वासन दिले आहे. आग्रा झोनचे एडीजी राजीव कृष्णा यांनी अशी माहिती दिली आहे की, कोणालाही मथुरेतील शांतता भंग करण्याची परवानगी दिली जाणार नाही. त्याचे कोणी उल्लंघन केल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. असेही ते म्हणाले.
मशिदीला भेट देणाऱ्यांची संख्या अनेक पटींनी वाढली
कडक सुरक्षा व्यवस्था असतानाही मुस्लिम समाजाची चिंता वाढली आहे. कृष्णजन्मभूमी आणि इदगाह मशिदीच्या वादाचा आगामी निवडणुकीत फायदा उठवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे अनेकांचे मत आहे.
हिंदू संघटनांकडून धमक्या मिळाल्यानंतर इदगाह मशिदीत येणाऱ्यांची संख्या अनेक पटींनी वाढल्याचे पोलिसांना गुप्तचरांकडून समजले आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या व्यक्तीला ओळखपत्र दाखवण्यास सांगितले जात आहे.
Big News : अयोध्येतील प्रभू राम मंदिर 2023 मध्ये भक्तांसाठी खुलं होणार
शाही इदगाह ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. झेद हसन यांनी सांगितले की, मुस्लिमांना भीती वाटते की निवडणुकीपूर्वी फूट पाडण्यासाठी हे सर्व केले जात आहे. त्यांनी सांगितले की, ते मथुरेत 5 दशकांपासून राहत आहेत आणि येथील लोक भगवान कृष्ण आणि अल्लाहच्या आशीर्वादाने जगायला शिकले आहेत. त्यांनी सांगितले की, त्यांच्या शाळेच्या भिंतीवर संस्कृतमध्ये श्लोक आणि कुराणातील आयतें लिहिलेले आहेत.
त्यांनी ‘आज तक’शी बोलताना सांगितले की, ‘मुस्लिमांना भीती वाटते की जातीय हिंसाचार भडकवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. अयोध्येनंतर श्रीकृष्ण जन्मभूमीचा वाद आणखी नवे वाद निर्माण करु शकतो. त्यामुळे पुढचा नंबर हा फतेहपूर सिक्री किंवा आग्रा मशीद किंवा इतर कोणत्याही देवस्थानाचा असू शकतो.’ अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
‘अयोध्येतल्या राम मंदिरासाठी शिवसैनिकांचं योगदान’ म्हणत मिलिंद नार्वेकरांनी पोस्ट केला बाबरी मशिदीचा फोटो
इदगाह ट्रस्टच्या इतर सदस्यांचे म्हणणे आहे की, ते कायदेशीर लढाईची तयारी करत आहेत, कारण मथुरा आणि काशी 1991 च्या कायद्याने अस्पर्शित आहेत. 1991 मध्ये, पीव्ही नरसिंह राव यांच्या सरकारने एक कायदा केला ज्याचे कलम 4 हे सर्व धार्मिक स्थळांचे संरक्षण करते जे 15 ऑगस्ट 1947 पर्यंत अस्तित्वात होते. त्यात काशी आणि मथुरेचाही समावेश आहे. या धार्मिक स्थळांमध्ये बदल करण्यासाठी कोणी न्यायालयातही जाऊ शकत नाही. अशीही त्या कायद्यात तरतूद आहे.
या प्रकरणी ‘आज तक’ने अनेक स्थानिक लोकांशी आणि धार्मिक नेत्यांशी चर्चा केली. अयोध्येत जे घडले आणि मथुरेत जे घडणार आहे ते सारखेच आहे असे बहुतेकांचे मत आहे. मथुरा कॉलेजमधील वरिष्ठ लेक्चरर म्हणाले, ‘1949 मध्ये अयोध्येतील मशिदीत रामलल्लाची मूर्ती ठेवण्यात आली होती आणि आता काही हिंदू संघटनांना मथुरेतील मशिदीत श्रीकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे. मुस्लिमांनी अयोध्या गमावली आणि त्यांना वादग्रस्त जागेपासून दूर जमीन देण्यात आली. आता मथुरेत 84 कोस बाहेरची जमीन देण्याचा प्रस्ताव आहे.’
ADVERTISEMENT